शेतकऱ्यांनी डीएपीऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी डीएपीऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन
लातूर, दि. १५ : जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पेरणीला लवकरच सुरुवात होणार असून, शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी वाढली आहे. मात्र, केवळ डीएपी खतांवर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे.
डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते. याला पर्याय म्हणून एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खताचा वापर सुचवण्यात आला आहे. एसएसपीमध्ये १६ टक्के स्फुरद, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असून, विशेषतः तेलबिया पिकांसाठी ते फायदेशीर आहे. डीएपीच्या एका गोणीऐवजी युरियाची अर्धी गोणी आणि एसएसपीच्या तीन गोण्या वापरता येतील. तसेच, एनपीके-१०:२६:२६, एनपीके-२०:२०:०:१३, एनपीके-१२:३२:१६, एनपीके-१५:१५:१५ यांसारख्या संयुक्त खतांमुळे नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध होऊन पिकांचे पोषण होते.
याशिवाय, टिएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खतात ४६ टक्के स्फुरद असून, डीएपीच्या एका गोणीऐवजी युरियाची अर्धी गोणी आणि टिएसपीची एक गोणी वापरता येते. शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करून डीएपीवरील अवलंबित्व कमी करावे, असे श्री. जाधव यांनी सांगितले.
*****
Comments
Post a Comment