विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

 विशेष लेख


मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटनही याला अधिक महत्त्व प्राप्त करून देईल. अशा या विशेष संमेलनानिमित्त मराठी भाषा संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय? याविषयी माहिती देणारा लेख...

लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य                                                     ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक                                                       जाणतो मराठी

एवढ्या जगात माय
मानतो मराठी...

अशा शब्दात कवी सुरेश भट माय मराठीविषयी आपली भावना व्यक्त करतात. मराठी भाषा ही अति प्राचीन भाषा आहे. मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिची योग्यता सिद्ध झालेली आहे; पुढे काय? एखाद्या भाषेचे संवर्धन करणे म्हणजे ती भाषा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जशीच्या तशी जाणे. भाषेचे मूळ रूप कायम ठेवले तरच ती भाषा अभिजात राहते. दक्षिणात्यलोक हे काम खूप चांगल्या पद्धतीने करत त्यांच्या भाषेचे संवर्धन करत आहेत. दक्षिणेतील राज्यात एखादी व्यक्ती कुठल्याही जाती, धर्म, समुदायाची असली तरी घरामध्ये तेथील मातृभाषा बोलली जाते. ही संस्कृती आपणासही अंगिकारावी लागेल.

मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार व प्रसार कसा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महानगरीय व मोठ्या शहरांमध्ये मराठी भाषेचा ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. गरजेनुसार इतर भाषाही जरूर बोलाव्यात पण मराठी भाषेची जपणूक करून. शाळांमध्ये मराठी भाषा हा विषय द्वितीय किंवा तृतीय भाषा न ठेवता सर्व शाळेत हा विषय पहिलीपासून प्रथम भाषा म्हणून शिकविला गेला पाहिजे. असे केले तरच लहान मुलावर बाल मनापासून संस्कार होऊन तो चांगली मराठी बोलणारा विद्यार्थी म्हणून उदयास येईल. असे केल्याने आपोआपच भाषा अभिजात राहील; पुढच्या पिढीकडे जशीच्या तशी हस्तांतर होईल.

सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयात मराठीतूनच संवाद साधण्याची पद्धत प्रत्येकाने सुरू केली पाहिजे. मित्रमंडळीत, नातेवाईकात, छोट्या मोठ्या कार्यक्रमात, लग्न समारंभात सगळीकडे घोषणा, भाषण, वार्तालाप हा जाणीवपूर्वक मराठीतच होईल, याकडे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीने पाहिले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. चालता, बोलता, फिरता मराठी भाषा जगली पाहिजे. जिथे कुठे बोलण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी मराठीतच बोलले पाहिजे. स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, मराठी भाषेशी निगडित काम करणाऱ्या संस्था, साहित्य परिषद यांनी वेगवेगळ्या स्तरावर ठराविक कालांतराने मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी मराठी भाषेतील वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. जसे की निबंध लेखन, कविता लेखन, शुद्धलेखन, सुंदर हस्ताक्षर, वादविवाद, अभिवाचन, कविता वाचन, दररोजच्या वापरातील वापरात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठी अनुवाद, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी.

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन उत्कृष्टरित्या होण्यासाठी दर्जेदार मराठी साहित्य निर्माण होण्याची तेवढीच गरज आहे. साहित्य हे मानवी दुःखाशी,  भाव-भावनांशी तादात्म्य पावते. साहित्यिकांनीही समाजाशी एकरूप होऊन लेखन करावे. मराठी साहित्याचा केंद्रबिंदू  ग्रामीण महाराष्ट्र आहे. ग्रामीण समाजामधून मोठ्या प्रमाणात लेखन होत आहे. म्हणूनच ग्रामीण समाजाचे प्रतिबिंब साहित्यात अधिक प्रमाणात येत आहे. ग्रामीण बोली भाषेत निर्माण होणारे साहित्य मग ते कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता किंवा कोणतेही साहित्य असो ते प्रकाशित होणे आवश्यक आहे. नवसाहित्यिकास पुढे येण्याची संधी यामधून मिळेल व मराठी भाषेची विविध रूपे वाचकास त्या पुस्तकातून अनुभवायास मिळतील.

स्वागताला ‘बुके’ नको पुस्तक द्या

प्रत्येक व्यक्तीची मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी वाचन संस्कृती रुजविणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गाव, शाळा, शहर पातळीवर ग्रंथालयाची निर्मिती करणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्यक्रमात, समारंभात अतिथींच्या स्वागतासाठी दिले जाणारे 'बुके' अर्थात पुष्पगुच्छ पद्धत बंद करून त्या ऐवजी 'बुक' म्हणजे पुस्तक देण्याची पद्धत प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. त्यामुळे मराठी साहित्यातील पुस्तकांचे वितरण होऊन ते वाचले जाईल. एकाने वाचल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य वाचतील. कुटुंबातील सर्व सदस्यांनी वाचल्यानंतर मित्र, नातेवाईक यांना ते पुस्तक दिले गेले तर वाचन संस्कृती रुजवण्यास हातभार लागेल. पर्यायाने मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन होण्यास या गोष्टी पूरक ठरतील. ई पुस्तक वाचन करण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचन करणे कधीही उपयुक्त व फायद्याचे असते.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय होणार?



मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे बऱ्याच नवनवीन गोष्टी घडणार आहेत. त्यामध्ये केंद्र शासनाकडून भाषेचे संवर्धन करण्यासाठी ठराविक निधी उपलब्ध होईल. त्यामधून महत्त्वाच्या मराठी साहित्यकृतीचा इतर भाषेत अनुवाद होऊन जगभरात ते साहित्य पोहोचविले जाईल. महत्त्वपूर्ण साहित्य कृतीचे ‘डिजिटायझेशन’ केले जाईल. मराठी भाषेच्या साहित्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाईल.  संपूर्ण भारतातील केंद्रीय विद्यापीठात मराठी भाषेचा विभाग सुरू होईल. वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातील. त्यामधून भाषेचा प्रचार, प्रसार होईल. मराठी भाषेचे विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यास मदत होईल.

- डॉ. सलीम शेख,
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर तथा साहित्यिक व मराठी भाषा विचारवंत



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन