गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत - पालकमंत्री गिरीश महाजन
लातूर जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने पाहणी
· शेतकऱ्यांच्या बांधावर जावून घेतली नुकसानीची माहिती
· राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; भरीव मदतची ग्वाही
लातूर, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यात
17 व 18 मार्च रोजी अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून
त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिले.
लातूर जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची
माहिती मिळताच पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज तातडीने लातूर येथे येवून
नुकसानीचा आढावा घेतला. तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची
पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच या
अस्मानी संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तातडीने मदत
देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
पालकमंत्री श्री. महाजन यांच्या उपस्थितीत
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार
अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त
बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे,
उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन
अधिकारी एम. एस. दुसिंग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
दत्तात्रय गावसाने, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच
व्ही. वडगावे यावेळी उपस्थित होते.
अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात ज्वारी, हरभरा सारख्या पिकांसह
आंबा, द्राक्षेसारख्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. गारपीट
आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरु करण्याचे
आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी
वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. महाजन यांनी आढावा बैठकीत दिल्या.
लातूर जिल्ह्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा
उल्लेख करून लातूर शहरात नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत
खासदार सुधाकर शृंगारे यांनी सूचना केल्या.
अवकाळी
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचमाने करताना ते अधिकाधिक वस्तुनिष्ठ व अचूक होतील, याची दक्षता घ्यावी, अशा
सूचना आमदार रमेश कराड यांनी केल्या.
औसा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला असून
द्राक्षे बागा, ज्वारीसह इतर
पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचमाने तातडीने सुरु करावेत, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात 17 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने
देवणी तालुक्यात सुमारे एक हजार 67 हेक्टर, अहमदपूर तालुक्यात सुमारे आठ हेक्टर आणि जळकोट तालुक्यात सव्वाचार हेक्टर
क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच 18 मार्च रोजी
झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील इतरही
तालुक्यांमधील शेतपिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचा
संप सुरु असला तरी शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कर्मचारी सहकार्य
करणार आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचेही
त्यांनी सांगितले.
अवकाळी
पावसाच्या नुकसानीची बांधावर जावून पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर
जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत
आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून
शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. रेणापूर तालुक्यातील रामवाडी येथील पंढरी
उगिले यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे गारपिटीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री
श्री. महाजन यांनी पाहणी केली. तसेच पानगाव फाटा येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
करून शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने
झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून
याबाबत अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल. या नैसर्गिक संकटात
शासन शेतकऱ्यांची पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री श्री. महाजन यांनी
शेतकऱ्यांना दिली.
कर्मचारी
संप, जिल्हा वार्षिक
योजनेचा आढावा
राज्य कर्मचारी बेमुदत संप आणि जिल्हा वार्षिक
योजनेच्या खर्चाचाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात
झालेल्या बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्यातील 17 हजार 782 कर्मचाऱ्यांपैकी 7 हजार 859
कर्मचारी संपत सहभागी असून 9 हजार 346 कर्मचारी कर्तव्यावर हजार असल्याचे
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अभिनव गोयल, विलासराव
देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी संपकालीन परिस्थितीत
आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जलाशयांमध्ये
पुरेसा पाणीसाठा, टंचाईची
स्थिती नाही
जिल्ह्यातील जलाशयांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठ्याचा
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आढावा घेतला.
जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम,
लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणी टंचाईची
परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नसल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी
सांगितले. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी 72 पाणीसाठा असून
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी 55 टक्के पाणीसाठा असल्याचे त्यांनी
सांगितले. लातूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत योजनेतील कामांसाठी
गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.
*****
Comments
Post a Comment