अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन
लोकांनी ‘ह्याच देही ह्याच डोळा’सोहळा पाहावा

      लातूर दि.22:- मुंबईलगतच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 ला होत आहे. हा भूमीपूजन सोहळा ‘ह्याच देही ह्याच डोळा’ पाहण्याची संधी लातूर जिल्ह्यातील जास्तित जास्त जनतेनी घ्यावी.
प्रमुख नद्यांचे पाणी व गडकिल्यावरची माती :-
      हा सोहळा संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे.
क्षेत्र :-
      राजभवनापासून जवळच असणा-या अरबी समुद्रातील सुमारे 16 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात भव्य स्मारक होणार असून यात शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा उभारला जाणार असून या पुतळ्याची उंची जगात सर्वात जास्त असणार आहे.
तेजस्वी व गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब :-
       आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणा-या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राचे तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.
खर्च व सुविधा :-
       या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षा विषयक व्यवस्था, आदि बाबींचा समावेश आहे.
बारा विभागाच्या परवानग्या :-
      या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालीका, बेस्ट,मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस. इंडिया, मत्सव्यवसाय विभाग,राष्ट्रीय सुरक्षा दल,दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत.


व्यवस्थापन :-
     प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. येत्या 3 वर्षात स्मारक पुर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेवून प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे, यासाठी दिनाक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणुक करुन त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजुर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून त्वरीत कार्यवाही :-
     राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला. परंतू त्याच्या उभारणीसाठी त्यानंतर फारशा हालचाली झाल्या नाहीत. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत त्वरित कार्यवाही पूर्ण करुन स्मारकाच्या कामास गती दिली. अरबी समुद्रातील जागा निश्चित करुन त्या जागेवर स्मारक उभारणीस 28 फेब्रुवारी  2014 ला मान्यता दिली. त्यामुळे दिनांक 24 डिसेंबर 2016 रोजी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचा भूमीपूजन व जलपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

******



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु