‘कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ‘ऑन फिल्ड’

 


·       देवणी येथील दोन परीक्षा केंद्रांची पाहणी

·       तोगरी येथील परीक्षा केंद्रावर सुमारे दोन तास उपस्थिती

लातूर, दि. 27, (जिमाका): इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित विभागांची बैठक घेवून यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज देवणी, तोगरी येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेट देवून पाहणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी एक तासापासून परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत महसूल विभागाचे बैठे पथक तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी  दिले होते. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्था, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. त्यासोबतच आज त्यांनी देवणी येथील योगेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि विवेकवर्धिनी महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला अचानक भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल त्यांच्यासोबत उपस्थित होते.


जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी उदगीर तालुक्यातील तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्राची पाहणी केली. तसेच परीक्षा संपेपर्यंत सुमारे दोन तास ते याठिकाणी उपस्थित होते. याच दरम्यान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी वलांडी येथील परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु