समता दिंडीतून राजर्षी छत्रपती शाहू विचारांचा जागर !

 समता दिंडीतून राजर्षी छत्रपती शाहू विचारांचा जागर !

·        समाज कल्याण विभागाचा उपक्रम

लातूर, दि. 2(जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीदिनी सामाजिक न्याय दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथून समता दिंडीला सुरुवात झाली.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, लातूर जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तेजस माळवदकर, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, प्रादेशिक समाज  कल्याण उपायुक्त कार्यालयातील समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, उपशिक्षणाधिकारी मधुकर ढमाले यावेळी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

समता दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संविधान, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आदी विषयावर संदेश देणारे फलक हाती घेत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची माहिती दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथून निघालेली ही दिंडी गंजगोलाई, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, महात्मा गांधी चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर दिंडीचा समारोप करण्यात आला. ज्ञानेश्वर विद्यालय, यशवंत विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, देशिकेंद्र विद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, राजस्थान विद्यालय, परिमल विद्यालय, व्यंकटेश विद्यालय आणि कृपासदन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

***** 







Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित