कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची लातूर जिल्ह्यात विशेष अंमलबजावणी; अर्ज करण्याचे आवाहन
कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची लातूर जिल्ह्यात विशेष अंमलबजावणी; अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ०६ : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी लातूर जिल्ह्यात १९ जून २०२६ ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना ऑगस्ट २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आली असून, याद्वारे पीक काढणीनंतरची कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या २ कोटींपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत, तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्...