नैसर्गीक आपत्तीमध्ये शासन शेतक-यांसोबत
आहे
- पालकमंत्री
लातूर,दि. 19: जिल्ह्यात दिनांक 15
मार्च 2017 रोजी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे
फार मोठे नुकसान झालेले आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन पूर्णपणे
शेतक-यासोबत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून शेतक-यांना जास्तीत जास्त मदत
मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कौशल्य विकास, कामगार कल्याणमंत्री
तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.
पालकमंत्री
श्री. निलंगेकर म्हणाले की, गारपीटीमूळे शेतक-यांचे नुकसान झालेले असून या अडचणीच्या
परिस्थितीमधून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाणार आहे. तसेच
द्राक्ष फळपिक हे हवामान आधारित फळपिक योजनेत येत नसल्याने द्राक्ष बागायतदार शेतक-यांना
झालेल्या नुकसानीकरिता शासनाकडून कशाप्रकारे मदत मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील
औसा व लातूर तालुक्यात वादळीपाऊस व गारपीट झाल्यानंतर लगेच प्रशासनाकडून तातडीने पिक
नुकसानीचे पंचनामे सुरु झालेले असून या पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित
राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे श्री. निलंगेकर यांनी
सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री. निलंगेकर यांनी येलुरी व वरवडा येथील शेतक-यांच्या
शेतावर जाऊन गारपीटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळींब, ऊस, टोमॅटो,
कोबी आदि पिकांचा समावेश आहे.
यावेळी
प्रशासनाच्या वतीने वादळी पाऊस व गारपीटीने पशुधन दगावल्यामुळे येलुरी येथील ग्रामस्थ
श्री. रुद्राप्पा गुराप्पा बिराजदार यांना पालकमंत्री श्री. निलंगेकर यांच्या हस्ते
16 हजाराचा धनादेश देण्यात आला. येलुरी व वरवडा येथील नुकसानग्रस्त शेतक-यांनी पालकमंत्री
श्री. निलंगेकर यांच्याकडे पिकांच्या नुकसानीबद्दल शासनाकडून जास्तीत जास्त मदत लवकर
मिळावी ही मागणी करण्यात आली.
***
Comments
Post a Comment