जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १८ नवीन प्रकरणे दाखल
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १८ नवीन प्रकरणे दाखल
लातूर, दि. ०२ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १८ नवीन प्रकरणे दाखल करण्यात आली. तसेच यापूर्वी दाखल १३ प्रकरणांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांच्यासह विविध शासकीय विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
समस्या घेवून आलेल्या नागरिकांच्या अर्जांवर तातडीने निर्णय घेवून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न प्रत्येक कार्यालयात होणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या समस्येचे समाधान त्या कार्यालयाच्या स्तरावर होणार नसल्यास संबंधित नागरिकाला योग्य मार्गदर्शन करून त्याला विहित मार्गाने दाद मागण्याबाबत माहिती दिल्यास नागरिकांची वेळ बचत होईल. त्यामुळे प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्याविषयी तातडीने कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या.
*****
Comments
Post a Comment