भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याबाबतचे पत्र बनावट
भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याबाबतचे पत्र बनावट
· लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण
लातूर, दि. 02 (जिमाका) : बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी SIS India limited या नावाच्या खासगी कंपनीमार्फत क्षेत्रीय स्तरावर भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येत असल्याबाबतचे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र व्हायरल झाले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित झाल्याचे भासविण्यात आले असून हे पत्र बनावट आहे. भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याबाबत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोणतेही पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.
या पत्रात सुशिक्षित बेरोजगारांना सुरक्षा क्षेत्रातील प्रशिक्षण मिळून त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळवा, यासाठी एका खासगी कंपनीद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. यामाध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन शुल्क घेतले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. हे पत्र लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने व क्रमांक दंड/05/कावि/4088173/2025, दिनांक 28/05/2025 अन्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना निर्गमित करण्यात आल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, अशा प्रकारे कोणतेही पत्र लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेले नाही, स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अशा बनावट व फसवणुकीच्या प्रकारापासून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment