शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी; डीएपी खताला पर्यायी खते वापरण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी;
डीएपी खताला पर्यायी खते वापरण्याचे आवाहन
लातूर, दि. 06 : जिल्ह्यात कापूस पिकाची 80 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असली, तरी बदलत्या वातावरणामुळे मान्सूनच्या गतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.
सध्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी वाढली आहे. डीएपीमध्ये 18 टक्के नत्र आणि 46 टक्के स्फुरद असते. डीएपीच्या कमतरतेमुळे पर्यायी खतांचा वापर आवश्यक आहे. यामध्ये एसएसपी (सिंगल सुपरफॉस्फेट) हा उत्तम पर्याय आहे, ज्यामध्ये 16 टक्के स्फुरद, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. तेलबिया पिकांसाठी एसएसपीचा वापर विशेष फायदेशीर आहे. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपीचा वापर प्रभावी ठरू शकतो.
याशिवाय, एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 आणि एनपीके-15:15:15 अशा संयुक्त खतांचा वापर केल्यास नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्ये पिकांना मिळतात. तसेच, टिएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) मध्ये 46 टक्के स्फुरद असून, डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टिएसपीचा वापर हा देखील चांगला पर्याय आहे. शेतकऱ्यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन श्री. लाडके यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment