लातूर जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये खासगी दवाखान्यांचा सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. ०५ (जिमाका)
: जिल्ह्यातील गरजू, गरीब रुग्णांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
आणि महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी जास्तीत जास्त खासगी
दवाखाने या योजनेसाठी अंगीकृत होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील पात्र
दवाखान्यांनी पुढाकार घेवून योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले. योजनेत सहभागी असलेल्या खासगी
रुग्णालयांच्या समस्याही जाणून घेवून या समस्यांचा निपटारा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात
येईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील खासगी
डॉक्टर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात
संवाद साधताना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब
मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी गोरे
यांच्यासह जिल्ह्यातील खासगी डॉक्टर या बैठकीमध्ये प्रत्यक्ष, दूरदृश्य प्रणालीद्वारे
सहभागी झाले होते.
जिल्ह्यात महात्मा
जोतीराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये सद्यस्थितीत
१८ खासगी रुग्णालये आणि १६ शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. यामाध्यमातून गरीब आणि
गरजू कुटुंबातील रुग्णांवर ५ लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार केले जात आहेत.
जिल्ह्यातील इतर शहरातील खासगी रुग्णालयांनी या योजनेत सहभागी होवून जास्तीत जास्त
रुग्णांना सेवा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे
यांनी केले. तसेच सध्या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी आपल्याकडे आलेल्या
रुग्णांना चांगली सेवा द्यावी. त्यांच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ न करता या गरीब
रुग्णांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील जास्तीत
जास्त रुग्णांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी
जिल्ह्यात पुढील १५ दिवसात विशेष मोहीम राबवून आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात
येणार आहेत. या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनीही यामध्ये पुढाकार घेवून
जास्तीत जास्त नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यासाठी सहकार्य करावे. जिल्हा
शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याअनुषंगाने समन्वय करण्याच्या
सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. आभा कार्ड विताराणाचाही
त्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच नोंदणी पूर्ण झालेल्या नागरिकांचे आभा कार्ड
वितरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
*****
Comments
Post a Comment