खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यातंर्गत पीक स्पर्धेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
वृत्त क्र. : 453 दिनांक : 3 जुलै,2026
खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी
राज्यातंर्गत पीक स्पर्धेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. ०३ (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यातंर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगामन सन २०२६ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफुल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मूग व उडीद पिकांसाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ व भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या पिकासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असून सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये राहील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वत:च्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेवून शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते धनादेश, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरुप सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुका पातळी पहिले बक्षिस रुपये ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार रुपये, तिसरे बक्षीस २ हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये आणि राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये, तिसरे बक्षीस ३० हजार रुपये राहील. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment