साठवलेल्या पाण्यात होते डेंग्यू पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ! · डेंग्यूचा प्रसार टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक

 

राष्ट्रीय डेंग्यू दिन विशेष लेख                                                  दि. 15 मे, 2024

 

 

साठवलेल्या पाण्यात होते डेंग्यू पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती !

·         डेंग्यूचा प्रसार टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक


डेंग्यू ताप हा विशिष्ट्य विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यामुळे कोणतेही साठवलेले पाणी आठ दिवसापेक्षा जास्त ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.  सध्या उन्हाळा सुरु आहे, जिल्ह्यातील बऱ्याच गावामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने नागरिकांचा पाणी साठविण्याकडे कल दिसून येत आहे. अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पत्ती होवू शकते. या डासांची उत्पत्ती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. लोक सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही.

राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे, 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्यासाठी, नागरिकांपर्यत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन  साजरा करण्याचा उद्देश आहे.

मागील पाच वर्षातील लातूर जिल्ह्यातील डेंग्यू आजाराबाबतची माहिती घेतली असता असे दिसून येते की, सन 2020 मध्ये 16 संशयित रुग्णाचे रक्तजल नमुने घेण्यात आले, त्यामध्ये 2 नमुने दुषित आढळले. 2021 मध्ये 217 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. त्यापैकी 39 नमुने दुषित आढळले, तर 2022 मध्ये 233 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले, त्यापैकी 27 नमुने दुषित आढळले. यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या 461 रक्तजल नमुन्यांपैकी 75 नमुने दुषित आढळले. तसेच 2024 मध्ये एप्रिलअखेरपर्यंत घेण्यात आलेल्या 210 नमुन्यांपैकी 15 नमुने दुषित आढळून आले आहेत.

डेंग्यू ताप आजाराची लक्षणे

तीव्र स्वरुपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्याच्या मागे दुखणे, सांधेदुखी, उलट्या हाणे, अंगावर पुरळ येणे, शौचास रक्तमिश्रीत होण, ही डेंग्यू तापाची प्रमुख लक्षणे आहेत. पंधरा वर्षाखालील मुलांना जास्त त्रास होतो. रक्तजल नमून्याची तपासणीद्वारे रोगनिदान केले जाते. डेंग्यू तापाची लक्षणे आढल्यास डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावेत.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत किटकामार्फत विशेषत: डासामार्फत प्रसार होणऱ्या हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग, जे.ई. अशा रोगाच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य शासनाच्या आरोग्य विमागामार्फत करण्यात येतो. या रोगावर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने सर्व स्तरावरुन नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जेणेकरुन या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

अशी होते रोगप्रसारक डासांची उत्पत्ती

डासाच्या जीवनचक्रामध्ये अंडी, अळी, कोष व प्रौढ डास अशा चार अवस्थाअसून पहिल्या तीन अवस्था या पाण्यातील आहेत. पाण्यातील अवस्था नष्ट केल्यास डासाची उत्पत्ती रोखणे शक्य होईल. अंडीपासून डास तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. डेंग्यू व चिकुनगुन्या या रोगाचा प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्टाय या डासाची उत्पत्ती प्रामुख्याने आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठलेल्या स्वच्छ पाणीसाठ्यामध्ये होतो. हौद, माठ, रांजन, रिकामी टायर्स, नारळाच्या करवंट्या, कुलरमधील पाणी ओव्हरहेड टँक, भंगार सामान घर व घराच्या परिसरातील सर्व पाणीसाठे हे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आहेत.

किटकजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना

किटकजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना राबविल्यास उपयुक्त ठरेल. आठवड्यातून किमान 1 वेळेस पाण्याचे सर्व साठे रिकामे करुन घासून पुसून स्वच्छ कोरडे करुन पुन्हा वापरावेत. पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावेत. डबकी व पाण्याच्या टाक्या यामध्ये डास अळी भक्षक गप्पीमासे सोडावेत. पाणी वाहते करावे, डबके बुजविणे, डासोत्पत्तीस्थाने नष्ट करणे, साठलेल्या डबक्यात नाल्यात तेल वंगन टाकावे. झोपतांना अगरबत्ती व मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावेत. आवश्यकतेनुसार अबेटींग करणे. धुर फवारणी करणे आदी उपाययोजना कराव्यात.

लक्षणे दिसताच त्वरित दवाखान्यात जावे

ताप आल्यास तसेच उपरोक्त लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रक्ताची तपासणी करुन घ्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाच्या स्तरावर डेंग्यूच्या निदानाची सोय उपलब्ध आहे. दवाखान्यात जावून आवश्यकतो उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, आरोग्य परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. अर्चना भोसले-किर्दक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आरोग्य सेवा (हिपताप) सहाय्यक संचालक डॉ. वैशाली तांभाळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. हिंडोळे एस. एस. यांनी केले आहे.

-         शब्दांकन : जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु