लातूर जिल्ह्यात 15 एप्रिलपासून जल व्यवस्थापन कृती पंधरवडा
लातूर जिल्ह्यात 15 एप्रिलपासून जल व्यवस्थापन कृती पंधरवडा
लातूर, दि. 11 (जिमाका): जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांना त्याची माहिती मिळावी, या उद्देशाने लातूर जिल्ह्यात 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याला 15 एप्रिल 2025 पासून सुरुवात होईल.
15 एप्रिल रोजी जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन होईल. 16 एप्रिल रोजी जलसंपदा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. 17 एप्रिल रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ आणि जल पुनर्भरण उपक्रम राबवले जातील. 18 एप्रिल रोजी शेतकरी आणि पाणी वापरकर्त्यांशी संवाद साधला जाईल, तर 19 एप्रिल रोजी भूसंपादन, पुनर्वसन आणि कालवा संयुक्त पाहणी यासारख्या अडचणींचे निराकरण केले जाईल. 20 एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, 21 एप्रिल रोजी उपसा सिंचनाच्या पाणी परवानगीसाठी तक्रारींचे निराकरण आणि 22 एप्रिल रोजी अनधिकृत व्यावसायिक व औद्योगिक पाणी उपशाच्या प्रकरणांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.
23 एप्रिल रोजी जलसंपदा आणि कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धती, उत्पादकता वाढ आणि पाणी नियोजन यांवर बैठक आणि कार्यशाळा आयोजित केली जाईल. 24 एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी आणि थकीत पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतला जाईल. 25 एप्रिल रोजी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि सेवाभावी संस्थांशी संवाद आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातील. 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणी वापराचा जललेखा तपासला जाईल आणि सांडपाण्याच्या प्रकरणांचा शोध घेतला जाईल.
27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाने महामंडळाच्या नावे संपादित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदी आणि अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली जाईल. 29 एप्रिल रोजी पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, चर्चासत्र आणि कार्यशाळा आयोजित होतील. 30 एप्रिल रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा, महिला मेळावा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार यांसह पंधरवड्याचा समारोप होईल.
*****
Comments
Post a Comment