इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा लातूर दि. ३१ : जिल्ह्यातील १५२ परीक्षा केंद्रांवर इयत्ता दहावीची आणि १०० परीक्षा केंद्रांवर इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होत आहे. या परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वतयारी सुरु आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नुकताच या पूर्वतयारीचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या. शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातून ३९ हजार २४२ विद्यार्थी इयत्ता दहावी, तर ३६ हजार ५११ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत. प्रत्येक परीक्षा कक्षात, परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा देत असतांना विद्यार्थ्यांनी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचना प्रत्येक परीक्षा केंद्राच्या सूचनाफलकावर लावण्यात येणार आहेत. राज्य मंडळामार्फत तयार करण्यात आलेले परीक्षेतील गैरप्रकाराबाबतच्या शास्तीचे व्हिडीओ सर्व समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तालुकास्तर, जिल्हा परिषद स्तरावर व जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर झूम ॲपचा वापर करुन वॉर रुम स्थापित करण्यात येणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर त्रिस्तरीय नजर व निगराणी ठेवली जाणार आहे. कॉपी प्रकरणांची माहिती देण्यासाठी टोल फ्री मोबाईल संपर्क क्रमांक वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रास व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असेल आणि परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्रवार व परिसरामत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली. ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित