बोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी सतर्क राहून काम करावे- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 बोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी सतर्क राहून काम करावे- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


कृषि निविष्ठा संनियंत्रण बैठक
जादा दराने विक्री झाल्यास करवाई करण्याच्या सूचना

लातूर, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून आता खरीप पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बोगस बियाणे, खतांची विक्री होवू नये, यासाठी कृषि विभागाने सतर्क राहून काम करावे. यासाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. बियाणे, खते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून यावरच त्यांचा संपूर्ण खरीप हंगाम अवलंबून असल्याने चांगल्या दर्जाची बियाणे आणि खते उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित कृषि निविष्ठा संनियंत्रण समिती बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी सुभाष झोले यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि सेवा केंद्र असोसिएशनचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पेरणी सुरू झाल्यानंतर बियाणे, खतांची मागणी वाढणार असून या काळात शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक होवू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. बोगस बियाणे, खतामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण खरीप हंगाम वाया जावू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विक्री होवू नये, यासाठी कृषि विभागाने सतर्क राहावे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकानिहाय पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत कृषि सेवा केंद्रांची तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच आपण स्वतः कृषि सेवा केंद्रांची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोगस बियाणे, खते रोखण्यासोबतच जादा दराने होणारी विक्री रोखणे, लिंकिंग होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. असे गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांना खतांचा वापर, रासायनिक औषधांच्या फवारणीबाबत कृषि विभागाने मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात फळबाग लागवड, बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती देवून अधिकाधिक क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सव आयोजित करून सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करावा. तसेच तृणधान्य लागवडीसाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
***



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु