छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला लातूर जिल्ह्यात सुरुवात;
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला लातूर जिल्ह्यात सुरुवात;
• मार्च ते मे २०२६ दरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन
लातूर, दि. ०२ : ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मार्च ते मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर विशेष एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश एकाच दिवसात नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. शिबिरांमध्ये उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवांमध्ये सातबारा अभिलेखातील चुका दुरुस्त करणे व डिजिटल सातबारा व आठ-अ उतारे तात्काळ पुरवणे, दीर्घकाळ प्रलंबित असलेले फेरफार प्रकरणे निकाली काढणे, उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र आदी दाखल्यांचे वाटप, अकृषिक (एनए) जमिनीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट रद्द आणि एकवेळचे अधिमूल्य भरण्याची तरतूद याबाबत जनजागृती, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पी.एम. किसान योजना, भूसंपादन प्रकरणातील नोंदी अद्ययावत करणे आदी बाबींचा समावेश आहे.
शिबिरांचे प्राथमिक वेळापत्रक
• ७ मार्च २०२६ – हरंगुळ बु. (लातूर), किनीथोट (औसा), पोहरेगाव (रेणापूर), औराद शहाजनी (निलंगा), किनगाव (अहमदपूर) इत्यादी
• १४ मार्च २०२६ – बाभळगाव (लातूर), बेलकुंड (औसा), कारेपूर (रेणापूर), हलगरा (निलंगा), नळेगाव (चाकूर) इत्यादी
• १० एप्रिल २०२६ – गातेगाव (लातूर), भादा (औसा), पानगाव (रेणापूर), शिरुर ताजबंद (अहमदपूर) इत्यादी
• १७ एप्रिल २०२६ – कासारखेडा (लातूर), उजनी (औसा), पळशी (रेणापूर), निटूर (निलंगा), आष्टा (चाकूर) इत्यादी
• ८ मे २०२६ – जिल्ह्यातील प्रमुख नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर शिबिरे (लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, चाकूर, उदगीर, जळकोट)
इतर महसूल मंडळांच्या तारखा स्थानिक तहसीलदार कार्यालयामार्फत स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली असून, अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या महसूल संबंधित तक्रारी, अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरांमध्ये उपस्थित राहावे. या अभियानाचा लाभ घेऊन आपले प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment