करोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून
उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु
                                                -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत
*सर्व सामान्यानी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही
*चुकीचे संदेश पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई

लातूर,दि.6:- करोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्व सामान्यानी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. करोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असून प्रसार माध्यमावर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करोना व्हायरस संदर्भात बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, जिल्हयात करोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्व सामान्य नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. करोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संस्थान येथे 10 खाटांचा करोना बाधित कक्ष उभारण्यात आला आहे.  जिल्हयात जनजागृतीचे काम चालू असून जिल्हयातील शाळा, महाविद्यालय व उत्सवाच्या ठिकाणी करोना रोगा बाबतची जनजागृती करावी अशा संबंधित विभागांना सूचना दिल्या.
जिल्हयातील सर्व नागरिकांनी चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. स्वत:ची काळजी स्वत:नी घ्यावी. तसेच प्रसार माध्यमांनी चुकीचे संदेश प्रसारीत करु नयेत, चुकीचे संदेश प्रसारीत केल्यास संबंधीतांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.
प्रारंभी डॉ.मोनीका पाटील यांनी करोना व्हायरस बद्दल पिपीटीद्वारे सादरीकरण करुन करोना रोगा बाबतची माहिती सविस्तर विशद केली.बैठकीस जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                      *****



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु