शिखर
शिंगणापूर येथील चैत्र यात्रा रद्द
प्रशासनाच्या
आवाहनाला मंदिर ट्रस्टचा सकारात्मक प्रतिसाद
* मराठवाड्यातील जनतेने शिखर शिंगणापूरला न येण्याचे सातारा जिल्हा प्रशासनाचे आवाहन
लातूर,दि.18:-कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे
श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द
करण्यात आली आहे. कोरोनाचे संसर्गाचे संकट
रोखण्यासाठी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन भाविकांसह सर्वांनीच प्रशासनाला
सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले.
शिंगणापूर
येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रेचा 25 मार्च ते 8 एप्रिल या कालावधी असून यात्रेसंदर्भात
शिंगणापूर याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी,
माणचे तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार
भुजबळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, मानकरी भाविक उपस्थित होते.
शिंगणापूर यात्रेसाठी दरवर्षी 8 ते 10 लाख
भाविक येत असतात. त्यामुळे कोरोना संसर्ग होवू नये यासाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी यात्रेसंदर्भात
प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. श्रीमती जिरंगे म्हणाल्या, प्रशासन लाखो भाविकांच्या
भावनांचा आदर करीत आहे, मात्र कोरोनाचे संकट ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असल्याने त्यावर
मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिंगणापूर यात्रा रद्द करण्यात येत
आहे.
यात्रा
काळातील सर्व धार्मिक उत्सव संबंधित स्थानिक पुजारी, सेवाधारी यांनी करावेत अशा सूचना
देवस्थान समिती व पुजारी मंडळींना दिल्या. याशिवाय यात्रेसाठी ध्वज आणणे तसेच कावडी
आणण्यावर प्रतिबंध असल्याचे प्रांताधिकारी जिरंगे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यात्राकाळात
एसटी मार्फत कोणतीही जादा बसवाहतूक केली जाणार नसून यात्रेच्या अनुषंगाने कोणत्याही
सुविधा पुरविण्यात येणार नाहीत. कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून भाविकांनी
यात्राकाळात शिंगणापूरमध्ये गर्दी करू नये. असे आवाहन श्रीमती जिरंगे यांनी यावेळी
केले.
शिंगणापूर
यात्राकालावधीत गर्दी रोखण्यासाठी 144 कलमानुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे
उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी सांगितले. भाविकांना रोखण्यासाठी शिंगणापूरकडे
येणाऱ्या विविध मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन
केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून भाविकांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे
पालन करण्याचे आवाहन श्री. महामुनी यांनी केले.
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाने
घेतलेल्या शिंगणापूर यात्रा बंदीच्या निर्णयास शिंगणापूर सरपंच अभय मेनकुदळे, उपसरपंच
शंकर तांबवे, सर्व सदस्य, व्यावसायिक, सेवाधारी, देवस्थान समिती यासह कावडीधारक, ध्वज
मानकरी, भाविकांनी पाठींबा दिला. यात्रेच्या दृष्टीने प्रशासन घेत असलेल्या निर्णयास
सहकार्य करण्यात येईल, असे ग्रामस्थ व भाविकांनी
बैठकीमध्ये सांगितले.
मराठवाड्यातील जनतेला आवाहन
शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रेला मराठवाड्यातील
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. ती यात्रा रद्द केल्यामुळे भाविकांनी कृपया
गर्दी करून नये असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्या
वतीने करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment