भटक्या विमुक्तांच्या पालावर जावून शासकीय सेवांचा लाभ देणे संवेदनशील प्रशासनाचे उदाहरण !






·         राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

·         राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा

लातूर, दि. १६ : जिल्हा प्रशासनामार्फत भटक्या विमुक्तांना त्यांच्या पालावर जावून विविध शासकीय सेवांच्या लाभ देण्यात आला आहे. हा अपक्रम म्हणजे संवेदनशील प्रशासनाचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद करून छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ५५ शिबिरांचे आयोजन करून भटक्या विमुक्तांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या विविध सेवांच्या अंमलबजावणीची आढावा बैठक डॉ. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागरिकांना शासनाच्या विविध सेवा, योजनांचा लाभ विहीत कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तयार करण्यात आला. यानुसार राज्य शासनाच्या ६६२ सेवा अधिसूचित करून त्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत पातळीपासून ते जिल्हास्तरीय कार्यालयाशी संबंधित सेवांचा समावेश असून या सर्व सेवांसाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. या अर्जावर निर्णय घेण्यासाठी पदसिद्ध अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचा निपटारा विहीत कालावधीत करावा, अशा सूचना डॉ. जाधव यांनी यावेळी दिल्या.

अधिसूचित करण्यात आलेल्या काही सेवांमध्ये एकापेक्षा जास्त विभागांशी संबंधित काही सेवांचा समावेश आहे. अशा सेवांसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर परस्पर समन्वयाने विहित कालावधीत असे अर्ज निकाली काढावेत. यासोबतच प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त होणाऱ्या अपिलांचा निपटारा गतीने करावा. आपले सरकार सेवा केंद्रांमधून विविध सेवांसाठी अर्ज करता येतो, त्याचप्रमाणे अपीलही करता येतात. याबाबतचा फलक प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रामध्ये लावावा. तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तक्रार पेटी लावून त्याची जबाबदारी संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावी. या माध्यमातून प्राप्त तक्रारींचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दरमहा आढावा घ्यावा, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील व्यक्तींसाठी ५५ शिबिरे

विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी ५५ विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत भटक्या विमुक्तांच्या पालावर जावून त्यांना आधारकार्ड, रहिवास दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, मनरेगा जॉब कार्ड आदी शासकीय कागदपत्रे व सेवांचा लाभ देण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीमती टकले यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत देवून राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षाचीही डॉ. जाधव यांनी पाहणी केली.

राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ५ व्यक्तींना शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये वैशाली सिरसीकर यांना उत्पन्न दाखला, सुनील ओव्हळ यांना उत्पन्न व रहिवासी दाखला, प्रशांत गायकवाड आणि विधान मस्के यांना जात प्रमाणपत्र, शंकर चळवाड यांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन