प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेंतर्गत स्वामित्व सनदचे ई-वितरण
लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ३० गावांमध्ये स्वामित्व सनद वितरण
लातूर, दि. १८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेतंर्गत देशातील ५० हजार गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामित्व सनदचे ई-वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये दाखविण्यात आले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते मोगरगा गावातील मालमत्ताधारकांना प्रातिनिधिक स्वरुपात मालमत्ता पत्रक व सनद वितरीत करण्यात आल्या. तसेच जिल्ह्यात एकाच दिवशी ३० गावांमधील ८ हजार ५११ लाभार्थ्यांना सनद वितरीत करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख एन.एन. पटेल, उपअधीक्षक वैशाली गवई, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब वाघ यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.
गावठाणातील जमिनींचे जीआयएसद्वारे सर्वेक्षण व भूमापन करून मिळकतधारकांना स्वामित्व सनद वितरीत करण्यासाठी स्वामित्व योजना हाती घेण्यात आली आहे. यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला जात आहे. या योजनेंतर्गत तयार करण्यात झालेल्या स्वामित्व सनदचे ई-वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी त्यांनी देशातील काही लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून या योजनेमुळे त्यांना झालेल्या लाभाची माहिती घेतली. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थितांना संबोधित केले.
स्वामित्व योजनेतून गावठाणातील सर्व मिळकतींचे आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करून प्रत्येक मिळकतीचे स्वामित्व सनद तयार करण्यात आली आहे. मिळकतीचा नकाशाही या सनदीमध्ये देण्यात आला असल्याने प्रत्येक मिळकतधारकाला आपल्या मिळकतीच्या सीमांची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे मालकी हक्क, मिळकतीच्या हद्दीमुळे होणारे वाद थांबतील, असा विश्वास आमदार श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वामित्व योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ५०२ गावांतील ६९ हजार ३०४ मिळकतींच्या स्वामित्व सनद प्राप्त झाल्या आहेत. २३३ गावांमधील २२ हजार ६६१ मालमत्ताधारकांना सनद वाटप पूर्ण झाले आहे. तसेच आज एकाच दिवशी ३० गावांमधील ८ हजार ५११ लाभार्थ्यांना स्वामित्व सनद वाटप होत असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख एन.एन. पटेल यांनी सांगितले.
***
Comments
Post a Comment