खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन

 

खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन

लातूर, दि. 26 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद,  सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या अकरा पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असून सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये आणि आदिवासी गटासाठी दीडशे रुपये राहिल.  स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या  नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेसाठी भात पिकाच्याबाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर म्हणजेच एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांची पिकाची उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ-अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासीअसल्यास) पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा बँक खाते चेकबुक अथवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

तालुका पातळीवर अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये आणी दोन हजार रुपये अशी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे आहेत. जिल्हा पातळीवर दहा हजार रुपये, सात हजार रुपये आणि पाच हजार रुपये अशी प्रथम, द्विवीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे आहेत. राज्य पातळीवर प्रथम बक्षीस पन्नास हजार रुपये, द्वितीय बक्षीस चाळीस हजार रुपये आणि तृतीय बक्षीस तीस हजार रुपये राहील. या योजनेबाबतची अधिक माहिती कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु