जलसंधारण दिना’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ मध्ये मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत
जलसंधारण दिना’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ मध्ये
मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. १७ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून त्यांच्या जयंतीदिनी, २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारणाच्या कामांना व्यापक लोकसहभागाची जोड देत जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीचे मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार आहे. याचबरोबर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून २०, २१ आणि २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल ॲपवर मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती जगदाळे यांनी केले आहे.
अधिकृत समाजमाध्यमे :
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
जलसंधारणाच्या विविध उपक्रमांची माहिती
या विशेष मुलाखतीत सचिव जितेंद्र पापळकर राज्यातील जलसंधारणाच्या कामांची सद्यस्थिती, शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.०, माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे तसेच विविध मृदसंधारणाची कामे याबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील जलसंधारणाच्या कामांना अधिक परिणामकारक स्वरूप देताना पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन, पाणी अडविणे व जिरविणे, भूजल पुनर्भरण आणि भूजल पातळीत वाढ यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासाठी गावनिहाय जलआराखडा, स्थानिक जलस्रोतांचे नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व शाश्वत पद्धतीने वापर याबाबत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मुलाखतीत माहिती देण्यात येणार आहे.
लोकसहभागातून जलसुरक्षित महाराष्ट्र
जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी लोकसहभागाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शासनाच्या प्रयत्नांना ग्रामस्थ, शेतकरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाल्यास जलसुरक्षित महाराष्ट्राचे उद्दिष्ट अधिक वेगाने साध्य होऊ शकते. गावागावांत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक पातळीवरील सहभागाचे महत्त्वही सचिव पापळकर या मुलाखतीतून अधोरेखित करणार आहेत.
भविष्यातील जलव्यवस्थापनावर भर
हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची गरज या पार्श्वभूमीवर भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी शासनाचा दीर्घकालीन दृष्टिकोनही या मुलाखतीत स्पष्ट करण्यात येणार आहे. जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा शाश्वत वापर यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता तो लोकचळवळीचा भाग व्हावा, यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. जलसंधारण दिनाच्या निमित्ताने जलसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारून जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावे, हा संदेश या विशेष मुलाखतीतून देण्यात येणार आहे.
००००
Comments
Post a Comment