भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद

भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद • विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद • सूचना, अभिप्राय स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कक्ष लातूर, दि. १२ (विमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी टास्क फोर्सचा संवाद दौरा होणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे समिती संवाद साधणार आहे. तसेच ज्या नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी आपले लेखी अभिप्राय csn-examreformtaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवू शकतात. या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. सूचना आणि अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी कामाच्या अनुषंगाने ही समिती भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहील. नागरिक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष सादर करू शकतात. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत