गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
लातूर, दि. २३ : जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचमाने तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल्या. त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्याकडून दूरध्वनीद्वारे जिल्ह्यातील नुकसानीची माहिती घेतली.
रेणापूर, अहमदपूरसह इतरही तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यासोबतच घरांची पडझड झालेल्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.
प्राथमिक अहवालानुसार रेणापूर तालुक्यात सोमवारी काही ठिकाणी वादळी वारे व गारपीट झाली. यामुळे काही गावांमध्ये पत्र्याची घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच गहू, हरभरा व ज्वारी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच उदगीर तालुक्यातील वायगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने दिगंबर राम बेलकुंडे (वय 60 वर्षे) यांचा मृत्यू झाला. इतरही तालुक्यातील नुकसानीची माहिती घेण्यात येत असून सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
***

Comments
Post a Comment