‘महारेशीम अभियान २०२६’ अंतर्गत रेशीम रथाला पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दाखविली हिरवी झेंडी
लातूर, दि. ११ (जिमाका) : रेशीम शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात १० फेब्रुवारी २०२६ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत ‘महारेशीम अभियान २०२६’ अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त रेशीम शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाला आज पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हिरवी झेंडी दाखविली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.
रेशीम शेतीचे फायदे व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची माहिती देण्यासाठी रेशीम रथ गावा-गावांमध्ये जाणार आहे. महारेशीम अभियान अंतर्गत जिल्ह्यात रेशीम शेतीच्या प्रसारासाठी, माहिती देण्याबरोबरच नवीन रेशीम लागवडसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर व जीवनमान उंचावण्यास रेशीम शेतीमुळे मदत होणार आहे, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी सांगितले.
****

Comments
Post a Comment