स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात 15 ऑगस्ट साजरा

जिल्ह्यात 8 ऑगस्ट पासून विविध उपक्रमात नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग,घरोघरी तिरंगा ने जिल्ह्यात पसरले चैतन्य

येत्या 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती लढ्याचा अमृत महोत्सव,मोठ्या उत्साहात साजरा करु.

          लातूर,दि.15(जिमाका):-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपलं सर्वस्व त्यागून बलिदान दिलं. काहींनी संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं. त्या सर्व ज्ञात, अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अभिवादन केलं. येत्या 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती लढ्याचा अमृत महोत्सव सुरु होतो आहे. तोही मोठ्या उत्साहात आपल्याला जिल्ह्यात साजरा करु, अशी  भावना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी व्यक्त केली.

           देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. शुभेच्छापर देतांना म्हणाले की, अनेक थोर नेत्यांनी या स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थेची मजबूत पायाभरणी केली. त्यांच्यासह इतर अनेक महान नेत्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती दयावी लागली. त्या सर्व महान नेत्यांना व स्वातंत्र्य सेनानींना याप्रसंगी, अभिवादन करुन स्वतंत्र्य प्राप्त झाल्यापासून आपल्या देशाने व राज्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उद्योग, सांस्कृतिक क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती साधली आहे. सर्व सामान्य नागरिकांसह समाजातील मागासवर्गीय व दुर्बल  घटकांची उन्नती व  त्यांची आर्थिक प्रगती वेगाने होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हावेत  म्हणून आपले शासन त्यांच्यासाठी विकासाच्या अनेक योजना कार्यक्षमपणे राबवित असल्याचे सांगितले.

             लातूर जिल्ह्याबाबत माहिती देतांना ते म्हणाले की,  2022-23 हंगामामध्ये जिल्ह्यातील अधिसुचित पिकासाठी 8 लाख 28 हजार 401 पिक विमा अर्ज करुन शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये शेतकरी हिस्सा रक्कम रु 58.65 कोटी प्रिमियम जमा करून 5.65 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पिक संरक्षित केले आहे...या हंगामामध्ये काही सर्कल मध्ये अतिवृष्टी झाली असून तेथील पिकाचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील सात बाराचे 99 टक्के संगणकीकरण झाले आहे. चावडी दप्तराचेही अद्यावतीकरण सूरू करण्यात आले आहे. त्यामुळे महसूली विभागाचे काम येणाऱ्या काळात वेगवान होण्यास मदत होणार आहे.

                जिल्ह्यातील कोविड - 19 मधील मयत झालेल्या 8 अनाथ बालकांना पंतप्रधान सहाय्यता योजनेतंर्गत 10 लाख रुपयांची मुदत ठेव जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पोस्ट ऑफिस खात्यावर तर मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतंर्गत 5 लाख मुदत ठेव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आलेली  आहे. तसेच कोविड - 19 मुळे एक पालक गमावलेल्या 359 अनाथ बालकांना प्रति महिना रुपये अकराशे नुसार आतापर्यंत रुपये 19 लाख 57 हजार 700 इतके बाल संगोपन योजनेतंर्गत अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच 49 बालकांना शाळेच्या शुल्क माफीबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे,  त्यापैकी  10 बालकांची शुल्क माफ झाले असल्याचे सांगून  अजूनही कोरोना संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही. ज्या पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी आरोग्य विभागाला संपर्क साधून बुस्टर डोसची मात्रा घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केले. 

मराठवाडा मुक्ती लढ्याचा अमृत महोत्सव

              येत्या 17 सप्टेंबर 2022 पासून ते 17 सप्टेंबर 2023 हे वर्ष मराठवाडा निजामशाहीतून स्वातंत्र्य झाले त्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. लातूर जिल्ह्यातील अनेकांनी या मुक्ती लढ्यात अनमोल योगदान दिलं आहे. त्यांचा त्याग , बलिदान, समर्पण या प्रती विनम्र अभिवादन करण्याचे ... त्यांच्या थोर कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे वर्ष असणार आहे. आपण सर्व मिळून हे वर्ष अत्यंत विनम्रपणे विविध उपक्रमातून त्यांच्या स्मृती तेवत राहतील असे काही शाश्वत काम उभं करु या, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यावेळी म्हणाले. 

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध प्रशासकीय पुरस्काराचे वितरण

           महामहीम राष्ट्रपती यांचे गुणवत्ता पूर्ण सेवेचे पोलीस पदक सन -2022 लातूर जिल्हा पोलीस दलातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गूलाब महेबूब गूलाम हैदर गल्लेकाटू यांना गौरविण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव -2022 अत्यंत नेटके नियोजन केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) दत्तात्रय गिरी यांचा प्रमाणपत्र देवून यावेळी गौरव करण्यात आला.

             सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम शिरुर अनंतपाळ, सर्वोकृष्ट क्लस्टर प्रथम अहमदपूर तालुक्यातील वळसंगी, सर्वोकृष्ट ग्रामपंचायत प्रथम औसा तालुक्यातील आलमला , राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम निलंगा, सर्वोत्कृष्ट क्लसर औसा तालुक्यातील आलमला, सर्वोकृष्ट  ग्रामपंचायत प्रथम चाकुर तालुक्यातील अलगरवाडी महाआवास अभियान-ग्रामीणांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

              देशीकेंद्र माध्यविद्यालय, लातूर कु. कलकोटे अथर्व नामदेव, कु. कनगुले प्रदयुम्न बालाजी, कु. स्वामी रुतूजा महेश, कु. काळे निरंजन विनोद, केशवराज माध्यमिक विद्यालय,लातूर कु. शिरुरे इश्वरी दयानंद, कु. चव्हाण पियुश गोकूळ, कु. धुमाळ ओमकार बालाजी, पाटील भरत राजपाल, विद्याविकास माध्यमिक विद्यालय, लातूर कु. गायकवाड अजिंक्य रोहिदास,  स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कुल लातूर कु. कदम रोहन दशरथ, बसवनप्पा वाले न्यु इंग्लिश मि. स्कुल, लातूर कु. कुलकर्णी वरुण व्यंकटेश, ज्ञानप्रकाश बालविकास विद्यालय लातूर कु. शारखाने शुभम सतिश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा निवड परिक्षेत यशस्वी झालेल्या 14 विद्यार्थ्यांचा एकाचवेळी सत्कार करण्यात आला.

जिल्हास्तरीय लघुद्योजक पुरस्कार

              मे. गुडवील पॉली प्लास्ट अतिरिक्त उद्योजक सुनिलकुमार उपाध्याय यांना रुपये 15 हजार चा धनादेश  गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ , मे. प्रिया इंडस्ट्रिज एम.आय.डी.सी. लातूर येथील सौ. प्रतिभा प्रमोद अंदूरकर रुपये 10 हजार चा धनादेश  गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ यांना जिल्हा उद्योग केंद्र लातूर कार्यालयामार्फत वित्तीय वर्षे सन 2019-20 जिल्हास्तरीय लघुद्योजक पुरस्कार वितरण करण्यात आले.

            आरोग्य विभागामार्फत एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय व महाविद्यालय, विवेकानंद हॉस्पिटलअंतर्गत विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन ॲन्ड रिसर्च सेंटर लातूर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

          गंगाधर बाजीराव सोमवंशी यांनी तुळजापूर ते लातूर आझादी  दौड 75 किलोमीटर दौड पूर्ण केल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

आदर्श तलाठी,उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव

              रेणापूर तालुक्यातील तलाठी सज्जा- रेणापूर येथील गोविंद शिवाजीराव शिंगडे यांना सन 2021-2022 आदर्श तलाठी पुरस्कार प्रशस्तीपत्र व रोख रक्कम रुपये 5 हजार, उदगीर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, निलंगा तहसील कार्यालयातील येथील नायब तहसीलदार अरुण महापुरे व चाकूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बालाजी चितळे यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून तर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून डी. एम. माळी, लातूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून डी. आर. सुर्यवंशी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. 

लातूर शहरातील आय.एस.ओ. नामांकनासाठी

पात्र असलेल्या रास्त भाव दुकानदारांचा सत्कार

श्रुती महिला बचत गट सौ. शुभांगी पद्माकर साखरे दुकान क्रमांक 30, पंचशिला महिला बचत गट सौ. रत्नमाला दिलीप घोडके रास्त भाव दुकानदार म्हाडा कॉलनी, सादीकअली उस्मानसाब शेख दुकान क्रमांक 34, विश्वनाथ गुलाबराव माने दुकान क्रमांक 36, सौ. सुशिलादेवी लक्ष्मण माने दुकान क्रमांक 94 या 05 लातूर शहरातील आय.एस.ओ. नामांकनासाठी पात्र असलेल्या रास्त भाव दुकानदारांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते वीरमाता / वीरपत्नी यांचाही गौरव करण्यात आला.

         यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूबिंय, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, पत्रकार यांची भेट घेवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्तच्या

चित्रप्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

           भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी मोठया प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले. त्यात अनेकांना आपले जीवनही गमवावे लागले. अनेकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्याच्या झळा पुढे अनेक वर्ष बसत राहिल्या. त्याच्या स्मृती आणि त्यांच्या प्रती असलेली सहवेदना आपल्या स्मरणात राहव्यात म्हणून देशभर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. लातूरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात या "विभाजन विभाषिका स्मृती दिवस चित्र प्रदर्शनाचे " उदघाटन दिनांक 14 ऑगस्ट, 2022 रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आले आहे.


















        या प्रदर्शनात त्याकाळातले दुर्मिळ फोटो, त्यात गर्दीने भरलेल्या रेल्वे, त्या काळातील या हिंसाचाराचे दैनिकात आलेल्या बातम्या हे सगळे आहेत. आपल्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती मोठी किंमत मोजली आहे हे प्रदर्शन पाहुन आपल्याला कळेल.. आणि आजच्या स्वातंत्र्याचे मोलही कळेल त्यामुळे आज दि. 15 व 16 ऑगस्ट, 2022 असे दोन दिवस अधिकाधिक नागरिकांनी हे प्रदर्शन पाहावे असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हे प्रदर्शन पाहिले.


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु