जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त होणार विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 8 ते 15 ऑगष्ट दरम्यान होणार कार्यक्रमाचे आयोजन

 

जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त होणार विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

दिनांक 8 ते 15 ऑगष्ट  दरम्यान होणार कार्यक्रमाचे आयोजन

 

लातूर, दि. 4 (जिमाका) : लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"जसा साजरा केला त्याच कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत समारोपीय समारंभानिमित्त "माझी माती -माझा देश " अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिली आहे. दिनांक 08 ऑगष्ट ते 15 ऑगष्ट या कालावधीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय समारंभाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाचे दिन-निहाय सुक्ष्म नियोजन जिल्हा स्तरावरुन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 786 ग्रामपंचायतीमध्ये त्याची काटेकोर अमंलबजावणी करावी. त्याचबरोबर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे फोटो, सेल्फी काढून लातूर जिल्हा परिषदेच्या merimatimeradeshlatur.in या पोर्टलवर तसेच ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व सेल्फी केंद्र शासनाच्या http:yuva.gov.in/meri_maati_mera_desh या संकेत स्थळावर अपलोड करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

*जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा*

            दिनांक 8 ऑगष्ट 2023 रोजी ग्रामसभेचे आयोजन जिल्हातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणार असुन त्यामध्ये सांगता समारोहात राबविण्यात येणा-या उपक्रमाची चर्चा व नियेाजन करणे हा विषय ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय समारंभासाठीचे बॅनर्स व पोष्टर्स लावून जनजागृती तसेच प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. त्या दिवशी शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक 9 ऑगष्ट 2023 रोजी "वसुधा वंदन" अंतर्गत शिक्षण विभागामार्फत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी गावात प्रभातफेरी काढण्यात येणार असून एका कलशात माती गोळा करण्यात येणार आहे. हे उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये गावात प्रभातफेरीमध्ये एक लिटर आकाराचे कलशाची मिरवणुक काढून   " माझी माती - माझा देश " या अभियानासाठी कलशा मध्ये माती गोळा करणे ,अमृत सरोवर, शाळा व ग्रामपंचायतीमध्ये तयार केलेल्या शिलाफलकाचे स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियाच्या हस्ते उदघाटन करणे,मातीचा दिवा हातात घेवून पंचप्राण शपथ घेणे व सेल्फी काढणे व शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करणे यासारख्या उपक्रमाचा यामध्ये समावेश राहणार आहे.

            दिनांक 10 ऑगष्ट 2023 रोजी पंचायत समिती स्तरावर सर्व गावातून माती कलश जमा करणयात येणार आहे. ग्रामपंचायत स्तर व पंचायत समिती स्तरावर किमान 75 रोपांची अमृत रोपवाटीका तयार करणे.सर्व गावातील माती एकत्रीत करुन पंचायत समिती स्तरावर पाच लिटर आकाराचे दोन तांबे कलश तयार करणे व पंचायत समिती स्तरावर शिल्लक असलेले ध्वज नागरिकांना वितरीत करण्यासाठी ग्रामपंचायतीना देणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

     दिनांक 11 ऑगष्ट 2023 रोजी वसुधा वंदन अंतर्गत ग्रामपंचायत स्तर व पंचायत समिती स्तरावर अमृतवन तयार करण्यासाठी किमान 75 रोपांची लागवड करणे व त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर यावर्षी देण्यात आलेल्या उदिष्टा- प्रमाणे वृक्ष लागवड करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

            दिनांक 12 ऑगष्ट 2023 रोजी गावपातळीवर शहीद,क्रांती इ. सारखे गावपातळीवर देशभक्तीपर चित्रपट प्रोजेक्टरवर दाखविण्यात येणार आहेत. पंचायत समिती स्तरावर जमा केलेले पाच लिटर आकाराचे दोन कलश जिल्हा स्तरावर पोहचविणे व प्रत्येक घरी ध्वजारोहण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे शिल्लक असलेले व पंचायत समितीकडून प्राप्त ध्वजाचे वितरण नागरिकांना करणे. इ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            दिनांक 13 ऑगष्ट 2023 रोजी गावपातळीवर "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावपातळीवर शाळेत विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.नगर परिषद /पंचायत मार्फत आयोजित अमृत महोत्सवी मॅराथॉनमध्ये सहभाग नोंदविण्यात येणार आहे.

            दिनांक 14 ऑगष्ट 2023 रोजी गावपातळीवर 'घरोघरी तिरंगा ' उपक्रम राबविणे, गावपातळीवर सायंकाळी मशाल फेरीचे आयोजन करणे व स्वातंत्र्य लढयातील आठवणींना उजाळा देणे व जिल्हास्तरावर आयोजित मशाल फेरीच्या मुख्य कार्यक्रमात सहभाग नोंदविणे यासारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            दिनांक 15 ऑगष्ट 2023 रोजी गावपातळीवर घरोघरी तिरंगा उपक्रम राबविणे,पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करणे, वीरांना वंदन अंतर्गत ध्वजारोहणानंतर गावातील सर्व स्वातंत्र्य सैनिक, वीर जवान व शहिद कुटुंबियांचा यथोचित सत्कार ग्रामपंचायतीमार्फत करणे, विविध शालेय स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्यांना बक्षीस देणे व शाळेत "एक मुल एक झाड" अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करणे तसेच पंचायत समिती स्तर व ग्रामपंचायत स्तरावर 'एक कर्मचारी एक झाड ' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करणे इ उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

     

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु