विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रमास सुरुवात

 

विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजउपक्रमास सुरुवात

·         जिल्ह्यास्तरावर 100 नवसंकल्पनांचे होणार सादरीकरण

·         राज्यस्तरीय सादरीकरणासाठी जिल्ह्यातून 10 नवसंकल्पनांची होणार निवड

लातूर, दि. 5 (जिमाका) : राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतीच झाली. विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. त्यांना प्रोत्साहन तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त 3 विद्यार्थ्याचा समूह पात्र असेल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिंनी, समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. हा उपक्रम तीन टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्यात करण्यात येईल.

दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम दोन संकल्पनांमधून, सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या 100 नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट 10 विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट 10 विजेत्यांमध्ये, 30 टक्के महिला 50 टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे विद्यार्थी व एक जिल्हा एक उत्पादनसंबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बीज भांडवल देण्यात येईल.

उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दहा अशा एकूण 360 नवउद्योजकांना 12 महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या 360 नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार आहे. यामधून सर्वोत्कृष्ट 10 नवउद्योजकांना प्रत्येकी पाच लाख रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहेत.

या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अधिकृत संकेतस्थळ www.msins.in अथवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेजच्या www.schemes.msins.in या पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु