ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त करण्यासाठी लातूर जिल्ह्यात विशेष मोहीम


·        ‘क्षयरोगमुक्त भारत’ संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन

·        पहिल्या टप्प्यात 50 ग्रामपंचायती होणार क्षयरोगमुक्त

·        उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान

लातूर दि. 14 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘क्षयरोगमुक्त भारत’ या संकल्पनेतून 2025 पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत स्तरावरही विशेष प्रयत्न केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायती पहिल्या क्षयरोगमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीचा 24 मार्च 2024 रोजी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात ‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत’ या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्यात 50 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींनी एक हजार लोकसंख्येमध्ये वर्षभरात किमान 34 संशयित व्यक्तीची क्षयरोग तपासणी होणे अपेक्षित आहे.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचा 24 मार्चला होणार सन्मान

क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत उपक्रमात उत्कृष्ट कार्य करून क्षयरोगमुक्त होणाऱ्या ग्रामपंचायतींना 24 मार्च, 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मानित केले जाणार आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायतींनी पूर्वतयारी सुरु केली आहे.

तीन हजार 250 क्षयरुग्ण नोंदणीचे उद्दिष्ट

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एक हजार 750 सार्वजनिक आणि एक हजार 500 खासगी अशा एकून 3 हजार 250 क्षयरुग्ण नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत सार्वजनिक स्वरूपातील मध्ये 840 आणि खासगी क्षेत्रात 888 अशा एकुण एक हजार 728 क्षयरुग्णांची नोंदणी झालेली आहे.

‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत’ या उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबाजवणी सुरु झाली आहे. पंचायतराज संस्थाना सक्षम करणे, हा त्यामागील उद्देश आहे. क्षयरोगाशी निगडीत समस्यांचे निराकरण करणे व क्षयरोग दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणे, त्यासाठी त्यांना पारितोषिक देवून जाहीर सन्मान केला जाणार आहे.

प्रधानमंत्री ‘क्षयरोगमुक्त भारत अभियान’ अंतर्गत

अतिरिक्त पोषण आहार किटसाठी आवाहन

उपचाराधिन असणाऱ्या सर्व क्षयरूग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी रुग्णांना अतिरीक्त मदत करण्याची गरज आहे. यासाठी क्षयरूग्णांना ‘प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान’च्या माध्यमातून जिल्ह्यात असणाऱ्या सर्व क्षयरूग्णांना स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, दानशुर व्यक्ती यांच्या सहभागाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत - 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्ट पुर्तीसाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

‘क्षयरोग राजदूत’ संकल्पना राबविणार

विद्यार्थी, शिक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शाळेमार्फत क्षयरोग राजदूत बनावे व विद्यार्थी, शिक्षक यांच्यामार्फत क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात यावी. तसेच इतर क्षेत्रामधील कार्यरत नामांकित व्यक्तींनीही क्षयरोग राजदूत म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकार डॉ. तांबारे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु