लातूर जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर विशेष लसीकरण मोहिम कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांचे आवाहन

 

                  लातूर जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर विशेष लसीकरण मोहिम

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांचे आवाहन

 

§  दि. 8 ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत मिशन कवच कुंडल या मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा

§  नागरिकांनी आरोग्य सेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन

 

      


लातूर दि.7 ( जिमाका ):-
 राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून त्या तुलनेत लातूर जिल्ह्याचे लसीकरण झाले नाही. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.  

       


कोरोना लसीकरण आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, व्हीएसटीएफचे जिल्हा समन्वयक विनायक थोर, शिक्षणाधिकारी किशोर काळे, उपायुक्त मयुरा सिंदेकर, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, महिला व बालविकास अधिकारी  व्ही. जी. यादव  यांच्यासह संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. बैठकीत बोलतांना म्हणाले की, संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यापूर्वी आपण सर्वांनी जागरुक राहणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिल्या लसीकरणाचा डोस 46 टक्के  नागरिकांनी घेतला आहे.  तर दुसरा डोस हा 19 टक्केच नागरिकांचे लसीकरण झाले आहे. हे जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी असून लसीकरणाचा वेग जलदगतीने वाढविणे आवश्यक आहे. तसेच त्याचे आरोग्य विभागाने तात्काळ आराखडा तयार करुन नियोजन करावे, व तसा अहवाल द्यावा. तसेच जळकोट व अहमदपूर या तालुक्यातील नागरिकांनी लसीकरण आपण व आपल्या कुटूंबांचे करुन घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दक्ष राहून जवळच्या लसीकरण केंद्रावर आपली नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे. येत्या दि. 8 ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत मिशन कवच कुंडल या मोहिमेत नागरिकांनी आपला जास्तीत-जास्त सहभाग नोंदवून लसीकरण करुन घ्यावे. शाळेतील शिक्षकांनी व त्यांच्या कुटूंबांनी व विद्यार्थ्यांनीही आपआपले लसीकरण करुन घ्यावे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे त्रिसुत्रीचा अवलंब ( मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अतंर) चा अवलंब करावा. लसीकरण मोहिमेत नागरिकांचा महत्वाचा सहभाग असणे अत्यंत महत्वाचे असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

जिल्ह्यातील विविध नवरात्री महत्सव समिती मंडळानेही लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाला मदत करावी असे आवाहन केले. येत्या नऊ दिवसांच्या कालावधीत आरोग्य विभागाने नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. तसेच त्या-त्या गावातील सरपंच, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस, आशा वर्कर्स, पदाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत आप-आपल्या गावातील ग्रामस्थांना प्रोत्साहित करावे. जेणे करुन गावातील व शहरातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही.

      तसेच शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना यांच्याशी शिक्षण विभागाने व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे, झुम कॉलद्वारे बैठका घेवून तशा सुचनाही शिक्षकांना द्याव्यात असेही बैठकीदरम्यानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

       मनपा आयुक्त अमन मित्तल बैठकीत बोलतांना म्हणाले की, दि. 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत लातूर शहरात 24 तास या वेळेत विशेष लसीकरण कँम्पची सुविधा उपलब्ध  करुन देणार असल्याचेही सांगितले. तसेच या मोहिमेमध्ये घरोघरी आरोग्य सेवक येतील त्यांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करण्याचेही आवाहन केले.

00000

                     

                     

        

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु