‘मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर विशेष’ स्मृतीग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

 




लातूरचा इतिहास डिजिटल स्वरुपात आणण्यासाठी प्रयत्न करणार

-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·        मराठवाडा मुक्तिसंग्रामातील लातूरचे योगदान महत्वपूर्ण

·        शाळांमध्ये ‘एक तास मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी’ उपक्रम राबविणार

लातूर, दि. 17  (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामात लातूर जिल्ह्याचे योगदान महत्वपूर्ण आहे. या लढ्याचा लातूर जिल्ह्याशी संबंधित इतिहास ‘मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर विशेष’ स्मृतीग्रंथाच्या रूपाने शब्दरुपात मांडण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. आता लातूरचा इतिहास डिजिटल स्वरुपात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम : लातूर विशेष’ या स्मृतीग्रंथाच्या रविवारी, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी हुतात्मा स्मारक येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगतात श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या.

ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, इतिहासकार प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, स्मृतीग्रंथ संपादक मंडळातील सदस्य जयप्रकाश दगडे, विवेक सौताडेकर, भाऊसाहेब उमाटे, प्रा. डॉ. सुनील पुरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास हा मराठवाड्याच्या अस्मितेचे प्रतिक आहे. इतिहासाचा वेध घेतल्याशिवाय भविष्यातील विकास होवू शकत नाही. त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ते ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मराठवाडा मुक्तिलढ्याचा इतिहास पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर विशेष’ हा स्मृतीग्रंथही या उप्क्रमांचाच एक भाग आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये लातूर जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना, प्रसंग एकत्रित रुपात मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला असून यासाठी संपादकीय आणि लेखक मंडळाने खूप मेहनत घेतल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी नमूद केले. तसेच एका ग्रंथामध्ये लातूरचा इतिहास मांडणे शक्य नसून ही एक सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले.

ब्रिटीशांच्या विरोधात लढल्या गेलेल्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा निजामाविरुद्ध लढला गेलेला मुक्तिसंग्रामाचा लढा अतिशय वेगळा होता. सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय गुलामगिरीविरुद्ध सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या या लढ्याचा लातूर केंद्रबिदू होता. लातूर येथील आर्य समाजाचे मराठवाडा मुक्तिसंग्रामात मोठे योगदान होते. तसेच महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन लातूर येथे झाले आणि याच अधिवेशनानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी मुक्तिलढ्याचे नेतृत्व स्वीकारले. महाराष्ट्र परिषदेची सहापैकी दोन अधिवेशने लातूरमध्ये झाली होती, असे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील लातूर जिल्ह्यातील घटनांचा  इतिहास मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर विशेष’ या ग्रंथाच्या रूपाने मांडण्यात आला आहे. यामध्ये वाचकांना काही त्रुटी आढळ्यास निदर्शनास आणून द्याव्यात. त्याची दुरुस्ती करून पुढील आवृत्ती अधिक अचूकपणे करण्यात येईल, असे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सोमनाथ रोडे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम हा लोकांनी लढलेला लढा होता. या लढ्याचा इतिहास मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ग्रंथरुपात लोकांपर्यंत नेण्याचा स्मृतीग्रंथाच्या रूपाने केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे म्हणाल्या.

प्रारंभी प्रास्ताविकामध्ये जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी ग्रंथ निर्मितीमागील भूमिका विषद केली. तसेच स्मृतीग्रंथाच्या संपादकीय मंडळातील ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, इतिहास अभ्यासक विवेक सौताडेकर, भाऊसाहेब उमाटे यांनी यावेळी आपल्या मनोगतात ग्रंथनिर्मिती करताना आलेले अनुभव विषद केले. यावेळी संपादक मंडळातील सर्व सदस्यांसह ग्रंथाच्या निर्मितीसाठी सहाय्य करणारे ग्राफिक्स डिझायनर, किरण कुलकर्णी, रेखाचित्रकार विजय बैले आणि शिवाजी हांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी मानले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु