लातूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव ; जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी

 लातूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव ; जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी


महाराष्ट्रामधील २० जिल्हयामध्ये लंपी चर्मरोगाचा पशुधनामध्ये प्रादुर्भाव दिसुन आला आहे. हा आजार कॅप्रीपॉक्स नावाच्या विषाणूमुळे होतो. हा आजार १९२९ पासुन १९७८ पर्यंत मुख्यत: आफ्रीकेत आढळत होता. भारतामध्ये सदर रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये उडीसा राज्यात झाली. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ राज्यात ह्या रोगाचा प्रादुर्भाव आढळुन आला. महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्हयात (सिरोंचा) मार्च २०२० पासुन सुरू झाला. 

-: रोगाची कारणे व प्रादुर्भाव :-

लंपी चर्मरोग हा विषाणूजन्य साथीचा आजार आहे.

रोगाचे जंतु देवी विषाणूजन्य  कॅप्रीपॉक्स या गटातील आहेत.

हा आजार गाई व म्हशीमध्ये आढळतो. 

शेळया मेढयांमध्ये हा आजार होत नाही. 

विदेशी व संकरीत गाईमध्ये देशी वंशाच्या गाई पैक्षा रोग बाधेचे प्रमाण अधिक तीव्र असते. 

सर्व वयोगटातील जनावरात हा आजार आढळतो. मात्र लहान वासरे व प्रौढ जनावरांमध्ये याचे प्रमाण तुलनेने अधिक आढळुन येते. 

उष्ण व दमट हवामानामध्ये किटकांची वाढ जास्त प्रमाणात होत असल्याने या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव  अधिक प्रमाणात दिसुन येतो. 

लंपी चर्मरोग प्रादुर्भावाचा दर १० ते २० टक्के आहे. तर मृत्यु दर १ ते ५ टक्के आहे. 

आजारामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी बाधीत पशुधन अशक्त होतात. दुध उत्पादन मोठयाप्रमाणावर घटते, तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजननक्षमता घटते. त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. 

या रोगामुळे पशुधनाची त्वचा खराब झाल्याने पशुधन खुप विकृत दिसते. पशुधनाच्या देखनेपणा व सौंदर्यावर याचा परिणाम होतो. 

-: रोगप्रसार :-

आजाराचा प्रसार मुख्यत: चावणाऱ्या माशा (स्टोमोक्सीस), डास (एडीस), गोचिड , चिलटे (क्युलीकॉईडस) यांच्या मार्फत होतो. 

आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. 

विषाणू  संक्रमण झाल्यानंतर ते १ -२ आठवडयापर्यंत रक्तात राहतात . त्यानंतर शरिराच्या इतर भागात संक्रमीत होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू  बाहेर पडुन चारा व पाणी दुषित होते. त्यातुन इतर जनावरांना या विषाणूची लागण  होऊ शकतो. 

त्वचेवरील खपल्या गळुन पडल्यानंतर त्यामध्ये ३५ दिवसापर्यंत विषाणू  जिवंत राहू शकतात. 

पशुधनाच्या विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा प्रसार कृत्रिम रेतन किंवा नैसर्गीक रेतनातुन होऊ शकतो.

गाभण पशुधनात या रोगाची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोग ग्रस्त वासराचा जन्म होऊ शकतो. 

दुध पिणाऱ्या वासरांना आजारी गाईच्या दुधातुन व स्तनावरील वृणातुन रोगप्रसार होऊ शकतो. 


-: लक्षणे :-

बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्त काळ साधारणपणे २ ते ५ आठवडे एवढा असतो.

या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळयातुन व नाकामधुन पाणी येते. 

लसीका ग्रंथीना सुज येते. 

सुरवातीस भरपुर ताप येतो. 

दुध उत्पादन कमी होते. 

चार खाणे , पाणी पिणे कमी होते. 

त्वचेवर हळुहळु १० ते ५० मिमी. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान,पाय,मायांग (जनन इंद्रीय) व कास या अवयवावर येतात.

काही वेळा तोंड , नाक व डोळयात वृण निर्माण होतात. तोंडातील वृणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. डोळयातील वृणामुळे चिपडे येतात. तसेच डोळयाची दृष्टी बाधित होते. 

या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा पुशधनाला होऊ शकते. 

रक्तातील पांढऱ्यापेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. 

पायवर सुज येउन काही पशुधन लंगडतात. 

सांध्यावरील गाठीमुळे व सुजेमुळे जनावरांना बसताना व उठताना त्रास होतो. 

-: रोग नियंत्रण :-

बाधीत जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकांनी हात डेटॉल किंवा अल्कोहल मिश्रीत सॅनिटायझरने धुवून घ्यावेत. 

तपासणी झाल्यानंतर कपडे व पादत्राणे गरम पाण्यात धुऊन निजर्तुंक करावेत. 

बाधीत जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे वाहन, परिसर निजर्तुंक करावेत. 

गोठा व परिसर स्वच्छ हवेशीर ठेवावे. 

परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. 

किटकनाशक औषधीचा जनावरांच्या अंगावर व गोठयात फवारणी करावी. 

आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टींन चे इंजेक्शन दिल्यास किटक नियंत्रण होऊन रोग प्रसारास काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसुन आले आहे. 

सद्या भारतात या रोगावरची लस उपलब्ध नाही. मात्र शेळयातील देवी रोग प्रतिबंधक लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येऊ शकतो. 

या विषाणुंचा मानवास सहसा प्रादुर्भाव होत नाही परंतु शेतकऱ्यानी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत किंवा सॅनिटायझरने साफ करून घ्यावेत. 

शास्त्रीयदृष्टया या साथीच्या काळात किंवा नेहमीच सर्वांनी दुध उकळून प्यावे. व मांस शिजवून खावे. 

प्रादुर्भाव ग्रस्त भागात जनावरांची ने-आण वाहतुक बंद करावी. तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात यावेत. 

रोग ग्रस्त जनावरांचा मृत्यु झाल्यास मृतदेह आठ फुट खोल खड्यात शस्त्रोक्त पध्दतीने पुरावा. 

सदर आजाराची बाधा झाल्यास १९६२ या टोल फ्री क्रमांकावर पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये या रोगाच्या उपचारासाठीची औषधे उपलब्ध आहेत. पशुपालकांनी या रोगाच्याउपचारासाठी औषधे विकत आणण्याची आवश्यकता नाही. खाजगी पशुवैद्यकाकडुन उपचार करून घेणे टाळावे. बाधित जनावरांची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थांना देणे हे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गीक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. 

लंपी चर्म रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. ०८.०९.२०२२ च्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्र राज्य हे नियंत्रित क्षेत्र घोषित करून गाई व म्हशींचे बाजार, शर्यती, प्रदर्शने व वाहतुक इत्यादीवर बंदी आणली आहे. 

-: लातूर जिल्हयातील लंपी चर्मरोग साथ रोग प्रादुर्भावाची सद्यस्थिती :-

०१] लातूर जिल्हयातील एकुण१०तालुक्यांपैकीलातूर, रेणापुर, औसा, निलंगाआणि अहमदपुर या ५

तालुक्यातील१६ गावामध्ये आज अखेर एकून १०२ पशुधन बाधित झालेलेआहे. 

०२] त्यापैकी ३ बैल वगळता ईतर पशुधनामध्ये उपचारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. व ४ बाधित रूग्ण 

पूर्णत: बरे झाले आहेत. 

०३]प्रथम रोग दिसून आलेल्या गावालाकेंद्र (Epicenter) धरून त्याभोवती ५ किमी त्रिजेच्या परिसरात

असलेलीजिल्हयातील८५ गावातील एकूण पशुधन संख्या ६६४२४ आहे त्यापैकी गायवर्ग ३४९८३ ईतकी

आहे.

०४] हा आजार म्हशींमध्ये क्वचित प्रमाणात पसरत असल्याने या भागातील ३४९८३ ईतक्या गोवंशास लसीकरण 

करावयाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत १३२२२ लसीकरण पूर्ण झालेले आहे.

जिल्हा परिषद स्वनिधीमधून १ लक्ष लस पुरवठा करण्यात आली आहे.येत्या ३ दिवसात हे 

करण्यात येईल.यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांचे पदवीत्तर विद्यार्थी व अधिवासातील विद्यार्थी 

      तसेच खाजगी सेवादाते यांची हि मदत घेण्यात येत आहे. 

०५] या आजारावरील औषधोपचाराचा प्रोटोकॉलमहाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापिठाने निश्चित करून दिलेला 

आहे. त्याप्रमाणे सर्व बाधीत पशुंवर ऊपचार सुरू आहेत. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात पुरेसाऔषधसाठा 

उपलब्ध आहे. तसेच प्रोटोकॉलप्रमाणे अधिकचा औषध पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय आवश्यक

औषधींची आवश्यकता भासल्यास स्थानिक स्तरावर खरेदी करून वापरण्याच्या सुचना क्षेत्रिय अधिकाऱ्यांना 

देण्यात आलेल्या आहेत. 

०६] बाधित गावात लसीकरण व ऊपचार संपूर्णत: मोफत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

०७]या रोगामधून पशुधन वाचविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने सर्व बाधित गावांमध्ये कीटक

नाशकांची फवारणी पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हयात ११६७पशुधनाच्यागोठ्यावर 

किटकनाशकांची फवारणी करण्यात आलेली आहे. 

०८] समाज व प्रसार माध्यमातून या रोगाची व त्यापासून कशा प्रकारे बचाव करावा याची माहिती 

पशुपालकांना देण्यात येत आहे. तसेच माहितीचे बॅनर व पोस्टर पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रांमपंचायत स्तरावर 

लावून जनजागृती करण्यात येत आहे. 

०९] लसीकरणासाठी सर्व पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचेशीघ्र कृती दल (R.R.T.) तयार करण्यात 

आलेले आहेत.

१०] तालुका स्तरावर नियंत्रणासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची 

समिती स्थापन करण्यात आलेली असून त्याद्वारे या रोग प्रादुर्भावावर संनियंत्रण करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु