मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला पुष्प दुसरे राजर्षी शाहू महाविद्यालयात संपन्न

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला

पुष्प दुसरे राजर्षी शाहू महाविद्यालयात संपन्न

फारसा रक्तपात न करता मेजर जनरल जयंत चौधरी यांनी हैद्राबाद निजामाच्या तावडीतून मुक्त केले

                                                                        - प्रा. भूषण कुमार जोरगुलवार

लातूर दि.20 ( जिमाका ) भारत देशाच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता हैद्राबाद संस्थान हे त्या काळी नाभीच्या स्थानी होतं, भारत देशाच्या अखंडतेसाठी हे संस्थान स्वातंत्र्य करून भारतात विलीनकरण करणे हे अत्यंत महत्वाचे होते. निजामाने मात्र आपण स्वतंत्र राष्ट्र आहोत ही भूमिका घेऊन जागतिक दबाव वाढविण्याची कुटनिती अवलंबली होती. त्या निजामशाहीवर पोलीस कारवाई करताना फारसा रक्तपात न करता हैद्राबाद संस्थान मेजर जनरल जयंत चौधरी यांनी भारतात विलीन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक,  लेखक प्रा. भूषण कुमार जोरगुलवार यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प राजर्षी शाहू महाविद्यालय येथे आयोजित व्याख्यानमालेत त्यांनी गुंफले. यावेळी या मंचावर राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य डॉ. शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे उपस्थित होते.

   मराठवाडा मुक्ती लढा हा भारतीय स्वातंत्र्य लढया एवढाचं महत्वाचा स्वातंत्र्य लढा होता, पण स्वातंत्र्यानंतर 25 वर्षे हा स्वातंत्र लढा नसून देशांतर्गत प्रश्न होता अशी भूमिका असल्यामुळे 25 वर्षे यावर कोणीही काही लिहू शकले नाही. त्यामुळे या लढ्यातील अनेक पैलू समान्यापर्यंत पोहचले नाहीत. मराठवाडा मुक्ती संग्रामातील अगदी स्वामी रामानंद तिर्थ यांच्या पासून ते माजी पंतप्रधान आणि मुक्ती लढ्यातील सैनिक पी. व्ही.नरसिंह राव यांच्या पर्यंत सगळ्यांनी हा लढा स्वातंत्र्यासाठीच होता ही भूमिका घेतली. त्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा स्वातंत्र लढा होता ही मान्यता दिली असे महत्वपूर्ण विवेचन प्रा. जोरगुलवार यांनी यावेळी केले.

निजामाची कुटनिती

सातवा निजाम मीर उस्मान अली खान सिद्दिकी, असफ जाह हा अत्यंत चालाख, चतुर आणि धूर्त होता. याच्या बाबतीत अत्यंत साधी राहणीमान वगैरे यागोष्टी पेरल्या होत्या ह्या त्याच्या राजकीय चातुर्याचा भाग होता. 1911 ला ब्रिटिशांना दाखविण्यासाठी संस्थानात दिवाण पद दिले.. 1914 पर्यंत दोन दिवाण केले पण त्यांचा कारभार पसंद नसल्यामुळे 1914 ते 1919 या काळात सगळा कारभार एकट्यानी सांभाळून हे संस्थान फक्त संस्थान नाही तर स्वातंत्र देश व्हावा यासाठी स्वतंत्र टपाल खाते, स्वतंत्र चलन, स्वतंत्र सेवा आयोग, स्वतंत्र बँक, एवढेच नव्हे तर बोधन येथे साखर कारखाना त्यासाठी लागणारा ऊस म्हणून मांजरा नदीवर निजाम सागर हे धरण बांधून 12 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणण्याचे काम, हे सगळे नियोजन त्याच्या स्वतंत्र स्थान निर्माण करण्याच्या महत्वकांक्षेची साक्ष देणारे होते. हे  सर्व प्रा. जोरगुलवार यांनी सोदाहरण विस्तृत मांडणीतून दाखवून दिले.

            मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात युवकांना हा संग्राम कळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने अत्यंत स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला त्या बद्दल कौतुक करून प्रा. जोरगुलवार यांच्या व्याख्यानातून संपूर्ण असफ जाह निजाम राजवट विद्यार्थ्यांसह आम्हालाही अनेक नवीन पैलू माहिती झाल्याचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

    मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी व्याख्यानमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या मागची सगळी पार्श्वभूमी कळावी म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील मोठ्या महाविद्यालयात ठेवल्याचे प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.

ह्या सुश्राव्य व्याख्यानमालेचे सुव्यस्थीत नियोजन प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केले आणि सूत्रसंचालन कु. प्रतिक्षा मोरे या विद्यार्थ्यांनीने केले.

तिसरे पुष्प उद्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी व्याख्यानमाळेचे तिसरे पुष्प मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे अभ्यासक भाऊसाहेब उमाटे हे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे गुंफणार आहेत. अधिकाधिक युवकांनी हे व्याख्यान ऐकावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


                                                        




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु