अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासन सज्ज · १०९८ क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासन सज्ज
· १०९८ क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन
लातूर, दि. १६ : महाराष्ट्रात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक तसेच सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. याच पार्श्वभूमीवर, येत्या सोमवारी, २० एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात संभाव्य बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध दिशादर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यात मागील वर्षभरात (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) ६५ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले असून, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेचे व समन्वयित कार्यपद्धतीचे द्योतक आहे.
बालविवाह ही प्रथा बालकांच्या मूलभूत हक्कांच्या विरोधात असून, बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत असे विवाह बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहेत. बालविवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा असून, अशा घटना आढळल्यास तातडीने गुन्हा नोंदविणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांनी जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. संभाव्य बालविवाहाची माहिती मिळताच नागरिकांनी त्वरित १०९८ किंवा ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लातूर जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे आणि स्थानिक पातळीवर व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment