कृषि महाविद्यालयात “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा

 

कृषि महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

लातूर,दि.8(जिमाका):- जागतिक महिला दिनानिमित्त, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे (परभणी) "सुवर्ण महोत्सवी वर्ष" व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" औचित्य साधून आज आज लातूर येथील कृषि महाविद्यालयातील जिमखाना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त  विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. 

          या कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन करून  सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, डॉ. ए. पी.सूर्यवंशी, प्रमुख पाहुण्या सौ.आशाताई भिसे व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.  या  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या, प्रगतशील शेतकरी व राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या सौ.आशाताई भिसे लाभल्या होत्या.  "आदिशक्ती तू, प्रभुची भक्ती तू, झाशीची राणी तू,मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू." या काव्य पक्तीने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन मान उंचावण्यासाठी  ८ मार्चला विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्यातलाच एक भाग म्हणून प्रती वर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

          या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.जे.एम.देशमुख जिमखाना उपाध्यक्षा यांनी केले. ज्याला स्त्री आई' म्हणुन समजली तो जिजाऊचा  शिवबा झालाज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन समजली तो राधेचा "श्याम" झालाआणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झालाप्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणि यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे म्हणुनच स्त्री-शक्तिला माझा सलाम...असे शब्द बोलून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

         या  प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या (वक्त्या) सौ.आशाताई भिसे यांनी आपले विचार व्यक्त करत असताना, महिला व पुरुष यांच्या समानतेवर जास्त भर दिला महिला व पुरूष समानता हवी असेल तर अगोदर समाजाची मानसिकता बदलली पाहिजे असेही त्यांनी मत व्यक्त केले.

            प्रत्येक स्त्री ने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वत:ची ओळख निर्माण करावी. आजकाल महिला कोणत्या क्षेत्रात नाही अस नाही. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत.त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत.तरी देखील काही भागात अजून देखील आपल्या पुरुष प्रधान प्रणाली मुळे स्त्रियांना कमी लेखले जाते. आता आपल्याला हे चित्र बदलायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले.

          अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगद सुर्यवंशी यांनी आधुनिक काळातील महिला / नारी चार भिंतीच्या बाहेर पडून जगाला गवसणी घालत आहे. खेळापासून मनोरंजनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालय, कृषि व इतर अनेक क्षेत्रांमध्ये महत्वाच्या जबाबदारीपर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत असे महिलांप्रती  गौरवोदगार  व्यक्त केले.

          इतर मान्यवारांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयात 28 फेब्रुवारी ते 04 मार्च, 2022 दरम्यान सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते.

       त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. व्यासपीठावर डॉ.ए.एस.कारले, डॉ.बी.एस.इंदुलकर व जीमखाना उपाध्यक्षा डॉ.ज्योती देशमुख त्‍याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी आणि सर्व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी - विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सायली चांदगुडे यांनी केले, तर  सहाय्यक प्राध्यापिका ममता पतंगे  यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली.

0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु