6 ऑक्टोबर रोजी बालेवाडी क्रिडा संकुल, पुणे येथे नैसर्गिक शेती" विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

 

6 ऑक्टोबर रोजी बालेवाडी क्रिडा संकुल, पुणे येथे

नैसर्गिक शेती" विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

 

 

*"विविध स्तरांवरून केले जाणार थेट प्रक्षेपण*

 

*लातूर दि.1(जिमाका):-* कृषी विभागामार्फत दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी बालेवाडी क्रीडा संकुल,पुणे येथे "नैसर्गिक शेती" याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या युट्यूब वाहिनीद्वारे प्रसारित केले जाणार आहे. तसेच  ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन संस्था इ. ठिकाणीही  या  कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

             या कार्यशाळेत गुजरात राज्याचे राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेस राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, कृषी मंत्री  श्री.अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री श्री. संदीपान भुमरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

            पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला देशात प्रोत्साहन देणे, रासायनिक खतांच्या मुख्यतः युरियाचा वापर कमी करणे, यावर भर देण्याचे निर्देश दिलेले आहेत. या दृष्टीने गुजरातचे राज्यपाल श्री.आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसार याबाबतचे मार्गदर्शन मिळणार आहे. श्री.आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाची सुमारे दोनशे एकर शेती पूर्णतः नैसर्गिक शेतीमध्ये कशी परिवर्तीत केली आणि भविष्यात हा शाश्वत शेतीचा पर्याय कसा होऊ शकतो, याबद्दल त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

             राज्यभरातून सुमारे २ हजार शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या तांत्रिक सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन ऐकायला मिळणार आहे. या कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

             अन्नधान्याच्या आणि संकरित वाणाच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, किटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात असंतुलित व अमर्याद वापर होत असून पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धूप होणे, सेंद्रिय खतांचा कमी वापर अथवा अजिबात वापर न करणे, एकच पीक वारंवार घेणे इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकाचा विनाश झाल्याने जमिनी मृत होत चालल्या असून कडक होत आहेत. रासायनिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना रसायने आणि विविध किटकनाशकांची हाताळणी दररोज करावी लागत असल्याने कर्करोगसदृश्य आरोग्यविषयक समस्येलाही सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे जीवन धोकादायक बनले आहे. परिणामस्वरूप मानवी व पशूपक्षी यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊन पर्यावरणासह सागरी जैवविविधतेस देखील धोका निर्माण झालेला आहे.

             सद्य:स्थितीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध असलेले नैसर्गिक व जैविक शेतीचे विविध मॉडेल्स पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत पिक उत्पादनाची खात्री देणारे असून या सर्व पध्दती प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक ज्ञानावर आधारीत आहेत. नैसर्गिक व जैविक शेतीमुळे अधिक पोषक व सुरक्षित अन्न मिळत असल्यामुळे ग्राहकांचा यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. नैसर्गिक शेती पध्दतीने पिकविलेल्या सुरक्षित अन्नामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या आरोग्याच्या फायद्यामुळे या अन्नपदार्थांची मागणी मोठया प्रमाणात वाढत आहे.

             तरी या कार्यशाळेच्या सूवर्णसंधीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु