लातूर येथे 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' अंतर्गत पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक उत्साहात
लातूर येथे 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' अंतर्गत
पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक उत्साहात
लातूर, दि. ३०: जिल्हा रेशीम कार्यालय येथे केंद्रीय रेशीम बोर्ड अंतर्गत 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' या उपक्रमाची पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक मंगळवारी झाली. या बैठकीसाठी केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ डॉ. बाबुलाल सायनी यांनी तुती लागवड व कीटक संगोपन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल तांत्रिक मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले.
यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी सांगितले की, शेतीला जोडधंदा म्हणून 'सिल्क व मिल्क' (रेशीम आणि दुग्ध व्यवसाय) केल्यास प्रति एकरी उत्पादनात मोठी वाढ होते. या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी वेगळे चारा पीक घेण्याची गरज भासत नाही. रेशीम कीटकांनी खाऊन उरलेला तुतीचा पाला हा प्रथिनांचा भरपूर मोठा स्त्रोत आहे. हा पाला जनावरांना खाऊ घातल्यास दुधाचे प्रमाण वाढते, दुधाचे फॅट चांगले बसते आणि जनावरांची तब्येतही उत्तम राहते, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हा रेशीम कार्यालयातील तांत्रिक अधिकारी श्री. सुरनर, तांत्रिक सहाय्यक श्री. पवार, श्री. देशमुख, श्री. कदम, श्री. वाघमारे, श्री. डोंगरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी व चॉकीधारक शेतकरी आकाश जाधव आणि शत्रुघ्न फड हे उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment