जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वराज्य महोत्सव म्हणून 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत साजरा करणार

 

*जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वराज्य महोत्सव म्हणून*

*8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत साजरा करणार*

 

§  राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून या अभियानात,

§  आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवूया, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामील होऊ या...!              

                                                 -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

§  घरोघरी तिरंगा अभियान : ग्रामस्थ,स्वंयसेवा संस्था यांनी हरघर तिरंगा ही मोहिम उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून यशस्वी करावी

§  दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान घरोघरी तिरंगा या अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, व आपल्या घरावर तिरंगा फडकवावा.

§  आपल्या राष्ट्रध्वजाची मागणी, ग्रामपंचायत,वार्ड ऑफिस यांच्याकडेही नोंदवू शकता किंवा इतर ठिकाणावरुनही राष्ट्रध्वज खरेदी करु शकता

§  जिल्ह्यात 3 लाख 88 हजार 400 घरावर मोठ्या अभिमानाने फडकणार तिरंगा

         लातूर (जिमाका) दि. 28 :- लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार असून या महोत्सवा अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा ही मोहिमेचे आयोजन केले आहे. राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून या अभियानात आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवूया, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामील होऊ या...! ज्या लढ्यातून भारत देशाने स्वातंत्र्य मिळविले आहे, देशासाठी अनेक शुरवीरांनी बलिदान देवून स्वातंत्र्य मिळालेले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचा शासनाचा मानस आहे. आपल्या देशाप्रती अधिकाधिक प्रेरित व्हावी या उद्देशाने हर घर तिरंगा उद्देशाने घरोघरी तिरंगा लावून कृतज्ञता व्यक्त करण्याची मिळालेली संधी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, स्वंयसेवा संस्था यांनी हरघर तिरंगा ही मोहिम उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून यशस्वी करतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी व्यक्त केली.

               आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, तालुक्यातील अधिकारी यांची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

            लातूर जिल्ह्यात घरे 3 लाख 80 हजार 891, प्राथमिक शाळा 1 हजार 911 , माध्यमिक शाळा 683, जिल्हा परिषद 1, पंचायत समिती 10, ग्रामपंचायत 784, अंगणवाडी केंद्र 2 हजार 721, प्राथमिक उपकेंद्र 252, प्राथमिक आरोग्य केंद्र  (पीएचसी) 46, उपजिल्हा रुग्णालय 2, रुग्णालये व दवाखाने 514, प्राथमिक कृषि सह. सोसायटी 734 असे जिल्ह्यात एकूण 3 लाख 88 हजार 400 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विभागात मोठ्या सन्मानाने फडकणार आहे.  प्रत्येक नागरिकांनी तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे. तिरंगा फडकवितांना केशरी रंग वरच्या बाजूने असावा. घरोघरी तिरंगा हा दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत फडकलेला असेल, दररोज सांयकाळी उतरविण्याची आवश्यकता नाही. कार्यालयांनी मात्र ध्वज संहिता पाळावी. तिरंगा उतरवितांना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.

              दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सुरक्षित ठेवावा. अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जावू नये. तो सन्मानाने जतन करुन ठेवावा. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जावू नये.

ग्रामपंचायत,वॉर्ड ऑफिस  येथून विकत उपलब्ध होणार

             विविध स्तरातून सहकार्य मिळविण्यासाठी शाळा-कॉलेजेस, एनसीसी,एनएसएस, युवा मंडळ इत्यादी मधून तिरंगा वॉलेंटीयर्स म्हणून नियुक्त करावे. शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्याद्वारे ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस येथून विकत घेण्यात यावा.

         घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात घरांची, संस्थांची संख्यानुसार त्यांची खरेदी, वितरण, प्रत्यक्षात झेंडे लावणे इत्यादी सर्व बाबींची पूर्तता, संपूर्ण नियोजन करण्याची तालुका स्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी तर जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी ( सामान्य प्रशासन ) जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्राम विकास ) यांच्याकडे नियोजन राहिल अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

            ग्रामपंचायत,वॉर्ड ऑफिस इत्यादी ठिकाणी नागरिकांसाठी झेंडा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सार्वजनिक उपक्रम,  स्वंय सहाय्यता समूह, विविध नागरिक संगठन, एनएसएस, युवा मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.

सेल्फी विथ तिरंगा उपक्रम

               प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या शासकीय निवास, राहत्या घरी तिरंगा लावावे. सेल्फी विथ तिरंगा छायाचित्र काढावे. त्यांचे डॉक्युमेंटेशन करण्यात यावे. ,

या मोहिमेत विविध प्रसार माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन

               हर घर तिरंगा या मोहिमेबाबत विविध प्रिंट मिडिया, सोशल मिडिया, डिजीटल मिडिया तसेच या मोहिमेत विविध प्रसार माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

          जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, रोजगार सेवक, आशा आरोग्य कर्मचारी इत्यादी उपस्थितीत गृहभेट आयोजित कराव्यात. ग्रामस्थांशी संवाद साधून घरोघरी तिरंगा उपक्रमाची माहिती द्यावी. तसेच नागरिकांना स्वयंस्फुर्तीने तिरंगा झेंडा खरेदी करणे, तिरंगा झेंडा उपलब्धता असलेले ठिकाण व तिरंगा संहितेची माहिती द्यावी. विशेष ग्रामसभांचे आयोजन करुन सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा पत्राचे वाचन करावे. लोकसहभागातून ग्राम स्वच्छता मोहिम व 750 वृक्षाची लागवड आयोजित करण्यात यावी. शाळेतील विद्यार्थी, किशोरवयीन मुले-मुली, तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष, ग्रामस्थ यांच्या सहभागने प्रभात फेरीचे आयोजन करावे. गावातील तरुणांच्या सहभागातून मशाल फेरीचे आयोजन करावे . तसेच गावांमध्ये देशभक्तीपर गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, रांगोळी स्पर्धा, पथनाट्याचे अयोजन करावे . गावात शंभर टक्के घरोघरी तिरंगा फडकेल हे शासकीय यंत्रणानी पहावे. असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

स्वराज्य महोत्सव 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आयोजन

             8 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम घेऊन स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यास सांगितले असून येत्या दोन दिवसात त्याचे नियोजन त्या त्या विभागाने करावे असे आदेश दिले आहेत.


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु