“हर घर झेंडा”अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी तिरंगा ध्वज विकत घेवून स्वंयस्फुर्तीने या उपक्रमात सहभाग घ्यावा

 

हर घर झेंडाअभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी तिरंगा ध्वज विकत घेवून स्वंयस्फुर्तीने या उपक्रमात सहभाग घ्यावा

                             --जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

§  13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर झेंडा अभियान

§  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रम राबविण्यात येणार

§  जिल्ह्यातील विविध आठवडी बाजार, यात्रा याठिकाणी या कार्यक्रमाची प्रचार, प्रसिध्दी होणार

§  जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत तिरंगा ध्वज सशुल्क उपलब्ध करुन दिला जाणार

लातूर,(जिमाका)दि.18:- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारी, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर झेंडास्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव हा दिनांक 9 ते 17 ऑगस्ट, 2022 हा उपक्रम संपूर्ण लातूर जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे.

या उपक्रमातंर्गत प्रत्येक घर, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, अंगणवाडी, पतसंस्था, सहकारी संस्था, दवाखाने, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत व अंगणवाडीमध्ये  दिनांक 13 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ध्वज फडकविण्यात येणार आहे.

तेंव्हा, लातूर जिल्ह्यातील सन्मानीय खासदार, आमदार, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनाचे नेते, आजी, माजी, जिल्हा परिषद सदस्य, सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, म.न.पा. लातूर, नगरपालिका आजी माजी पदाधिकारी, समाजिक संस्था, लोकउपयोगी कामे करणारे दानशुर व्यक्ती, उद्योजक, व्यापारी व व्यावसायिक यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, हर घर झेंडा उपक्रम लातूर जिल्ह्यात साजरा करण्यासाठी नागरिकांना अंदाजे 4 लाख ध्वजाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे वरीलप्रमाणे प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी निधी अथवा ध्वज विकत घेवून नागरिकांना व संस्थांना मदत करावी, असे याद्वारे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात विविध विभागाच्या विभाग प्रमुख आणि  पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

     या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) चे दत्तात्रय गिरी यांची उपस्थिती होती. 

हर घर झेंडाउपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्ययोजना


राज्य सरकारने हर घर तिरंगा अभियानासाठी ग्राम विकास विभागास राज्य समन्वय संस्था म्हणून नामनिर्देशित केले आहे. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी, संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वंयस्फुर्तीने करणे अपेक्षित आहे. तिरंगाच्या निर्धारित केलेल्या रुपये तीस एवढ्या किमतीमध्ये प्रत्येक घराने ध्वज खरेदी करावा. तसेच प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक सार्वजनिक उपक्रम (बँक,पोस्टऑफिस इ.) स्वंय सहाय्यता समूह, विविध नागरिक संगठन, युवा मंडळांनी सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सुचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत व विविध शासकीय कार्यालये, संस्था हे साठवणूक आणि विक्री केंद्र असतील. स्थानिक तथा निवडक तिरंगा झेंडा पुरवठादार यांच्याद्वारा जिल्ह्यातील घरांच्या आवश्यक संख्येनुसार तिरंगा खरेदी करण्यात यावे. तिरंगा झेंडा साठवणूक केलेल्या ग्रामपंचायत येथून स्थानिक नागरिकांनी स्वंस्फूर्तीने तिरंगा खरेदी करण्याबाबत ग्रामपंचायत क्षेत्रात प्रशासनाने जाणीवजागृती करुन उपक्रम यशस्वी करावा. तिरंगा तयार करण्यासाठी स्वंय सहाय्यता समूह यांचे सहकार्य घेतले जावू शकते. तिरंगा हा निशुल्क असणार नाही, नागरिकांनी तो स्वच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात यावे. जिल्हा प्रशासनाकडून काही ध्वज संहितेनुसार ध्वज पुरविणारे पुरवठादार नेमण्याची प्रक्रिया सुरु आहे.जिल्ह्यातील घरे, विविध कार्यालये यांच्या संख्येनुसार तिरंगा तयार करण्यासाठी पुरवठादारांना कळविण्यात येणार असल्याचेही यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी माहिती दिली.

भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तिरंगा हा 20:30 इंच साईजमध्ये 30/- रुपयांमध्ये सुचविलेल्या पुरवठादाराकडून प्राप्त होवू शकते. (कबीर कुमार 7091472555, 8800265779, ई-मेल aniratcontracts@gmail.com ) .

राज्यातील तिरंगा झेंडा पुरवठादार आहेत,

जेथून ठोक स्वरुपात आपण झेंडा खरेदी करु शकतो


केव्हीआयसी, एनसीसीएफ केंद्र सरकारचा उपक्रम, जीईएम पोर्टल, स्थानिक विक्रेते, स्वयंसहाय्यता महिला समूह इ. Indiamart सारखी ऑनलाईन खरेदी, याशिवाय मुंबईत द फ्लॅग कंपनी वसई, द फ्लॅग शॉप इ. या उपक्रमाच्या जाणीव जागृतीसाठी राज्यातील विविध कार्यालये, टोलनाका, इत्यादी ठिकाणी कार्यक्रमाबाबतचे बॅनर, स्टँडी लावण्यात यावेत. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा नोडल अधिकारी यांची तथा इतर अधिकारी यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, व त्यांनी योग्य संनियंत्रण करावे. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पालक-शिक्षक बैठकांमध्ये या कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जावू शकते. त्याविषयी प्रचार प्रसिध्दीही करण्यात येणार आहे. पंचायत राज संस्थामध्ये व्यापक प्रमाणात प्रचार, प्रसिध्दी केली जाणार आहे. शैक्षणिक संस्था, अंगणवाडी, आशा वर्कर्स, बचत गट सीआरपी यांनी विद्यार्थ्यामध्ये, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी.

 

झेंडा कसा असायला हवा त्याबाबत….


तिरंगा झेंड्याचा आकार आयताकार असावा. तिरंगा झेंड्याची लांबी : रुंदी प्रमाण हे 3:2 असे असावे. तिरंगा बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन, पॉलिस्टर, सिल्क कापड यापासून बनविला जावू शकतो. झेंड्यामध्ये सर्वात वर केंशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असा तिरंगा बनविला जातो. मध्यभागी पांढऱ्या पट्टीवर 24 रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र असते.

प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितचे पालन करावे

अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करावे

प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितचे पालन करावे. तिरंगा झेंडा फडकावितांना केशरी रंग वरच्या बाजूने असावी. तिरंगा झेंडा उतरवितांना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सुरक्षित ठेवावे. अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करुन ठेवावा. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जावू नये. 

स्थानिक स्तरावरुन लोकप्रतिनिधी ,इतर प्रतिष्ठित नागरिक,

खेळाडू, अधिकारी यांना आवाहन*

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, उमेद प्रकल्प कर्मचारी यांच्याकडून तिरंगा झेंडा वितरणाबाबत विविध स्तरावरुन संनियंत्रण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध आठवडी बाजार, यात्रा याठिकाणी या कार्यक्रमाची प्रचार, प्रसिध्दी करण्यात येणार आहे. विविध स्तरातून सहकार्य मिळविण्यासाठी शाळा, कॉलेजेस, एनसीसी, एनएसएस, युवा मंडळ इत्यादीमधून वॉलेंटीयर्स म्हणून नियुक्त केले जाणार आहेत.  लोकप्रतिनिधी इतर प्रतिष्ठित नागरिक, खेळाडू, अधिकारी यांच्याद्वारा नागरिकांना  हर घर तिरंगा अभियानाबाबत आवाहन करण्यात यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली. प्रत्येक गावाला ग्रामपंचायतीमध्ये तिरंगा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी माहिती दिली.



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु