वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करुन अत्याधुनिक सोई, सुविधा व सवलतीचा लाभ घ्यावा

 

वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करुन

अत्याधुनिक सोई, सुविधा व सवलतीचा लाभ घ्यावा

 

लातूर,दि.7 (जिमाका):-  महामंडळाच गोदामात साठवणूकीसाठी ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखार पावतीवर ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध्‍ होत असल्याने संबंधित शेतकरी / ठेविदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रासाठीचा प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या सुविधांचा लाभ सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवून सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन लातूर विभाग प्रमुख के.आर. पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असून राज्यभरात गोदामाचे जाळे निर्माण करुन औद्योगिक व कृषि क्षेत्रास अन्नधान्याची नासाडी होऊ नये म्हणून साठवणूकीची सुविधा पुरविण्यासाठी वखार महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. महामंडळाव्दारे शेततीमाल तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनााशके यांची शास्त्रोक्त पध्दतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध्‍ करुन दिली जाते. महामंडळाची मुंबई, लातूर ,पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती व औरंगाबाद ही 8 विभाग आहेत.राज्यातील महामंडळाची एकूण 205 वखार केंद्रावर 1262 गोदामाची एकूकण साठवणूक क्षमता 21.15 लाख मे.टन इतकी आहे. महामंडळाच्या लातूर विभागात लातूर , हिंगोली, उस्मानाबाद, परभणी व नांदेड जिल्हा असून याअंतर्गत एकूण 33 वखार केंद्र व 147 गोदामे असून साठवणूक क्षमता 3 लाख 76 हजार मे. टन इतकी आहे.

शेतमाल उत्पादन बरोबरच शेतमालची सुरक्षित साठवणूक व त्याची विक्री व्यवस्थापन देखील महत्वाचे आहे. सुगी हंगामाच्या वेळी बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशा वेळेस कृषिमालाच्या प्राधान्य देऊन महामंडळ राज्यातील सर्व ठिकाणच्या गोदामामध्ये या हंगामात नियोजन करीत आहे. महामंडळाच्या सर्व गोदामाचे शास्त्रोक्त पध्दतीने शेती औद्योगिक मालाची साठवण केली जाते. ठेविदाराना दिलेली महामंडळाची वखार पावती परक्राम्य लेख (Negotiable Insrument ) असल्याने ती बँकेकडे  तारण ठेवल्यास, ठेविदाराना बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध्‍ होते. त्या आधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थ सहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणूकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालू पिकाचा 7/12 उतारा दिल्यानंतर वखार भाडयात प्रचलित साठवण दराच्या 50 टक्के सवलत देऊन 25 टक्के जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक पंधरावाडयामध्ये किड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यानी उपचारत्मक किटकनाशकांचा वापर करुन माल सुरक्षित ठेवण्यात  येतो. साठवणुकीस असलेल्या सर्व मालाचा 100 टक्के विमा संरक्षण दिल्या जाते, त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.

याशिवाय वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांचे करिता अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचावापर करुन राबविणयत येत आहे. याअंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून संबंधितांच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटीव्दारे जमा करण्यात येते या तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा 10 लाख प्रती शेतकरी व 75 लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी इतकी आहे.

 

                                              ****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु