पर्यटन उद्योगाला गती-कुमारी आदिती तटकरे राज्यमंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

 

                                                             दि. 06 जानेवारी 2022

 

पर्यटन उद्योगाला गती....

     कोरोना काळात सगळे जग ठप्प झाले होते. कोरोनानंतर पर्यटन, उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने सूक्ष्म नियोजन करून कोरोनाच्या नियमांचे पालन, त्यासाठीच्या आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला अधिक गती कशी देता येईल, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

कुमारी आदिती तटकरे

राज्यमंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार,

माहिती व जनसंपर्क

राज्यात गेल्या दोन वर्षात सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस चालना देण्यात आली. कोविड सारख्या प्रतिकूल परिस्थतीतही 59 सामंजस्य करार झाले आहेत. सूक्ष्म, लघू, मध्यम, मोठे आणि विशाल व अतिविशाल प्रकल्पांची विशेष क्षमता विचारात घेऊन त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या सोयीसुविधांचा समावेश असलेल्या सामूहिक प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे करण्यात येत आहे.

समुद्रकिनार्‍यांचा विकास

अंजठा, वेरूळ, घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या वास्तुकला असलेली पर्यटन स्थळे कायमच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. किल्ले व ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व संरक्षणाची दीर्घकालीन व्यवस्था करून त्यांचे महत्त्व पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गोवा राज्यातील किंवा जगभरातील किनारे शॅकमुळे प्रसिद्ध आहेत. कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण राबवून समुद्रकिनार्‍यांचा क्षमतेनुसार विकास करण्यात येत आहे. यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या आठ किनार्‍यांवर बीच शॅक उभारण्यात येणार आहेत. प्रत्येकी दहा शॅक उभारून हा पायलट प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे. यात स्थानिक 80 टक्के रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून परिसरातील, किनार्‍यावरील स्वच्छता व सौंदर्य राखून पर्यटकांना सुविधा व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

खेळाडूंना आर्थिक साहाय्य

क्रीडा क्षेत्राला अधिक उंचावण्यासाठी टोक्यो ऑलिम्पिक - 2020 साठी राज्यातील निवड झालेल्या 10 खेळाडूंना प्रशिक्षण व सरावासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयेप्रमाणे आर्थिक साहाय्य करणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. मानव विकास

निर्देशांकास उंची देण्यासाठी शासनाने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. मुलींमध्ये तंदुरुस्तीबाबत व आहार आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी. तसेच मुली खेळांकडे आकर्षित होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी इयत्ता पहिली ते बारावीमधील 6 ते 18 वयोगटातील मुलींसाठी गो-गर्ल-गो मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

न्यायालये स्थापन करण्यास मान्यता

राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकार्‍यांना नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना 1 नोव्हेंबर 2005 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वुमन अंतर्गत महिला व बालक अंतर्भूत असलेली बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गतची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यात 138 विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ऑगस्ट अखेर 18 विशेष पॉक्सो कोर्ट कार्यान्वित झाले आहेत. राज्यातील न्यायालयामांध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी 100 जलदगती न्यायालयांना 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या 1 वर्षाच्या कालावधीकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, पर्यटन ठप्प असले तरी शासनस्तरावर सूक्ष्म नियोजन करून अनेक उपाययोजना केल्या आहेत. पर्यटनातून सर्वांगीण विकास कसा करता येईल याचे नियोजन करून कोरोना सारख्या जागतिक संकट काळात प्रत्येक टप्यावर प्रगतिशील राहून महाराष्ट्र राज्य शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या दोन वर्षाच्या संकटकाळातसुद्धा महाविकास आघाडी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

 

शब्दांकन : काशिबाई थोरात-धायगुडे,

विभागीय संपर्क अधिकारी

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु