येत्या 15 जुलैपासून प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी परिवहन महामंडळाच्या आगारात ‘प्रवासी राजा दिन’
येत्या 15 जुलैपासून प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी
परिवहन महामंडळाच्या आगारात ‘प्रवासी राजा दिन’
लातूर, दि. 08 (जिमाका) : एस.टी. बस प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचनांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी 15 जुलैपासून प्रत्येक आगारात (डेपोत) दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना जाणून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्यास मदत होईल, असे मत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा- महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी 10 ते 2 या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील ‘प्रवासी राजा दिन’ कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे. याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या-त्या वेळी जाहीर करतील विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.
एसटीच्या विविध बसेस मधून दररोज सुमारे 54 ते 55 लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत असे वाटते. तसेच एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासंबंधित प्रवाशी तक्रारींचे निराकरण वेळत न झाल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते.
प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे. अर्थात, प्रवाशांचे समाधान हा उद्देश ठेऊन येत्या 15 जुलैपासून ‘प्रवासी राजा दिन’ या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व प्रवासी बंधू-भगिनींना या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकारण करून घ्यावे, असे आवाहन राज्य परिवहन मंडळाचे लातूर विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment