भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना,
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 11 (जिमाका) : राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन जीवनमान उंचाविण्यासाठी, त्यांना शेती अर्थसहाय्य देण्यासाठी सन 2024-25 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
आपले सरकार सुविधा केंद्र, महा-ईसेवा केंद्रावर जावून ऑनलाईन अर्ज करावेत. या योजनेमध्ये नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक आस्तरीकरण तसेच इतर बाबींमध्ये वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन संच, परसबाग, पंपसंच (डिझेल, विद्युत), पीव्हीसी तथा एचडीपीई पाईप आदी बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. सूक्ष्म सिंचन संचामध्ये ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच यासाठी प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजनांच्या अभिसरणातून 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी केंद्र, राज्य, जिल्हा परिषद अथवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नवीन सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी नवीन विहीरीसाठी व ज्या शेतकऱ्यांनी विहिरीचा लाभ घेतला आहे, त्यांनी इतर बाबीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, कृषि विकास अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जातीचे प्रमाणपत्रे , सातबारा, आठ अ उतारा (0.40 ते 6 हेक्टर मधील), आधारकार्ड, आधार संलग्न बँक खाते, उत्पन्न 1 लाख 50 हजारच्या आतील सन असल्याचा 2023-2024 चा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, ग्रामसभा ठराव, प्रस्तावातील इतर आवश्यक प्रमाणपत्र.
*****
Comments
Post a Comment