‘टी.बी.मुक्त गाव, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून 44 क्षयरुग्णमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार
‘टी.बी.मुक्त गाव, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून
44 क्षयरुग्णमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार
लातूर, दि. 10 (जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत लातूर जिल्हा परषिद आरोग्य विभागाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात ‘टी.बी.मुक्त गाव, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून टी.बी.मुक्त ग्रामपंचायत अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारून त्यांचेमार्फत ग्रामपंचायतींना प्रदान करण्यात आले.
पंचायत तथा सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक डॉ. व्ही. जी. गुरुडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. एस. हिंडोळे, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. एस. बी. खैरे डॉ. गिरीजा ठाकूर, डॉ.बी.व्ही. जाधव, डॉ. बनशेळकीकर एस.एन. यावेळी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर यांनी सर्व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. विभागाने अतिशय यशस्वीपणे उपक्रम राबवून जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या. यामध्ये आशा कार्यकर्तीपासून, आरोग्यसेवक व सर्वच क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेतले आहे. सन 2024-25 मध्ये दुप्पट ग्रामपंचायती क्षयरोग मक्त होण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच इतर विभागांनी देखील उत्स्फुर्त सहभाग नोंदवून क्षयरोग उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. क्षयरोगमुक्तीसाठी आरोग्य विभागाने क्षयरोग उपचार, उपचारासाठी आवश्यक प्रचार प्रसिद्धी तसेच क्षयरुग्णांसाठी फुड बास्केट या तीन मुलभूत संकल्पनांवर मोठ्या प्रमाणात काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मागील काळात जिल्हा परिषद तसेच इतर विभागांतील सर्वच अधिकारी, कमर्चारी यांनी क्षयरोग निर्मुलनासाठी सामजिक दायीत्व स्वीकारून टी.बी. रुग्णांना फुड बास्केट वितरणाची संकल्पना हाती घेतली व यशस्वी देखील केली. अशाच पद्धतीने आगामी काळात क्षयरोग निर्मुलनाची चळवळ हाती घेवून सर्व अधिकारी आणि कर्मचारी व क्षेत्रीय यंत्रणांनी आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त होण्यासाठी मोहीम स्वरूपात प्रयत्न करण्याची अपेक्षा श्री. सागर यांनी व्यक्त केली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) श्री. गिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून सर्व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले. तसेच आगामी कालावधीत देखील या उपक्रमासाठी पंचायत विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचे सर्व सहकार्य देण्याबाबत नमूद केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.गिरीजा ठाकूर, यांनी सर्व पुरस्कारप्राप्त ग्राम पंचायत, अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
*****
Comments
Post a Comment