लातूर तालुक्यात विशेष शिबिरांमध्ये अडीच हजारपेक्षा जास्त विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरण
लातूर तालुक्यात विशेष शिबिरांमध्ये
अडीच हजारपेक्षा जास्त विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरण
लातूर, दि. 08 (जिमाका) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुकख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, महसूल विभागातंर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न तातडीने निकाली काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी दरवर्षी महाराजस्व अभियान राबविण्यात येते. त्यानुसार 18 जून, 2024 ते 2 जुलै, 2024 या कालावधीत लातूर तालुक्यातील 9 मंडळामध्ये व लातूर शहरातील 10 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या लागणाऱ्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शिबिरांमध्ये विविध शाळा, महाविद्यालये व मंडळ स्तरावर 2 हजार 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली
विशेष शिबीर कालावधीत 668 रहिवासी दाखले, 1 हजार 8 उत्पन्न दाखले, वय-राष्ट्रीयत्व, अधिवासाची 363 प्रमाणपत्रे, 166 नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रे, 70 आर्थिकदृष्ट्या घटक प्रमाणपत्र (ईडब्ल्युएस), 228 जात प्रमाणपत्रे असे एकूण 2 हजार 503 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबीरातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न यशस्वी झालेला असून पुढील कालावधीत देखील असे उपक्रम वारंवार राबविण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले. या शिबीरामुळे शाळा, महाविद्यालय यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले.
महसूल प्रशासन नेहमीच जनतेपर्यंत आपल्या सेवा देण्याचा प्रयत्न करीत असते. प्रमाणपत्रे वितरणासाठी शिबिरांचे आयोजन हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून या शिबिरामधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले एकाच छताखाली व अतिशय कमी वेळात मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या वेळेत आणि खर्चात बचत झाल्याचे दयानंद महाविद्यालायचे पर्यवेक्षक दिलीप नागरगोजे यांनी सांगितले.
दरवर्षी शैक्षणिक प्रवेशावेळी विद्यार्थी व पालकाची होणारी तारांबळ आम्ही पाहत आलेलो आहोत, परंतु यावर्षी उपविभागीय अधिकारी रोहिणी-नेऱ्हे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी राबविलेल्या विशेष शिबिरामुळे सर्व विद्यार्थी व पालकांना एकाच ठिकाणी सर्व दाखले मिळाल्यामुळे त्यांची सोय झाली असून हा उपक्रम आमच्या शाळेत राबविल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, अशी भावना मुरुड येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव मेश्राम यांनी व्यक्त केली.
माझ्या मोठ्या मुलांच्या शैक्षणिक प्रवेशावेळी लागणाऱ्या दाखल्यांसाठी खूप धावपळ करावी लागली होती. तसेच हे दाखले काढण्यासाठी कोणती कागदपत्रे काढावी लागतात. याबाबत देखील पुरेसे ज्ञान नव्हते. परंतु, यावर्षी महसूल विभागाने राबविलेल्या विशेष शिबिरामुळे शैक्षणिक प्रवेशावेळी आवश्यक असणारे दाखले काढण्यासाठी कोणताही त्रास झाला नाही व तालुक्याच्या ठिकाणी न जाता देखील अतिशय कमी वेळेत सर्व दाखले एकाच ठिकाणी मिळाले. तसेच शेतकऱ्यांच्या पेरणीचे दिवस असल्यामुळे ही प्रमाणपत्रे देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावून दाखले काढणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते. त्यामुळे गावामध्येच असे उपक्रम राबविल्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाने असे उपक्रम वारंवार राबवावेत, जेणेकरुन सर्व सामान्य जनतेची सोय हाईल, अशी भावना विशेष शिबिराविषयी ग्रामीण भागातील पालकांनी व्यक्त केली.
*****
Comments
Post a Comment